पिंपरी – जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पवना धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे धरणातील आजचा पाणीसाठी 79.13 टक्के इतका झाला आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरवासियांवरील पाणी कपातीचे संकट तर्तास तरी टळले आहे.
संपूर्ण जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे पवना धरणातील पाणीसाठी 16.82 टक्के इतक्या निचांकी पातळीवर आला होता. जर जुलै महिन्यातही पावसाने ओढ दिल्यास पिंपरी चिंचवड शहरात पाणी कपात करावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाकडून महापालिकेस देण्यात आली होती.
मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. 7 जुलैपासून धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली. सुमारे 20 दिवसांत धरणातील पाणी साठ्यात 62 टक्क्यांनी वाढ झाली. आता धरणात 79.13 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. यामुळे पिंपरी चिंचवडकरांसह मावळवासीयांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.