किशोर वारुळे
सावरगाव – निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या जुन्नर तालुक्यत अनेक निसर्गरम्य स्थळे असली, तरी दाऱ्या घाट विलक्षण आहे. सध्या पावसाळ्यात या घाटावरील रान हिरवेकंच झाले असून त्याच्या अंगाखांद्यावर खळाळणारे निर्झर (धबधबे)पर्यटकांना खुणावत आहेत.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या जुन्नर शहरापासून पश्चिमेकडे अवघ्या 20 किमी अंतरावर आंबोली-उच्छिल-दाऱ्याघाट हा अत्यंत रमणीय परिसर आहे. आपटाळे या गावात आल्यावर उत्तरेला नाणेघाटाकडे फाटा फुटतो तर सरळ गेल्यानंतर आपण दाऱ्याघाट परिसरात पोहोचतो. खरंतर आपटाळे गाव सोडल्यापासूनच आपल्याला सृष्टीची विविधता अनुभवास यायला सुरुवात होते.
रस्त्याच्या अगदी शेजारून खळखळ वाहणारी इवलुशी मीना नदी, दोन्ही बाजूंना असलेल्या सह्याद्रीच्या रांगांमधून अविरत अखंड वाहणारे पांढरेशुभ्र धबधबे, त्यावर मधूनच होणारे काळाकुट्ट ढगांचे आच्छादन, आणि रिमझिम बरसणारा पाऊस, यामुळे येथे आलेला पर्यटक नकळत या सृष्टीसौंदर्याच्या प्रेमात पडून जातो. पश्चिम घाटातील इतर ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात वाढलेले पर्यटन, गर्दी पाहता जाणकार पर्यटकांना मात्र आजही दाऱ्याघाटच खुणावत असतो. तसेच असपासच्या परिसरात भात शेतीचे पाण्याने तुडुंब भरलेले खाचरे असे विलोभनीय दृश्य अनुभवण्यासाठी दाऱ्या घाट गाठलेच पाहिजे.
निसर्गाने या ठिकाणी भरभरून आपले दान टाकले आहे. तुलनेने कमी धोकादायक असल्याने अनेक जण सहकुटुंब पर्यटनाला येण्यासाठी दाऱ्याघाटाला पसंती देतात. या ठिकाणी दोन-तीन छोटी दुकान-कम हॉटेल्स आहेत, तेथे तुमच्या मागणीनुसार जेवण व नाश्ता बनवून दिला जातो. शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचे गरमागरम ताजे चुलीवरचे जेवण आणि सोबत गरमागरम चहा पर्यटनाची लज्जत आणखी वाढवितो. या परिसरात वेगळ्या प्रकारचे दुर्मिळ बेडूक आढळतात. याशिवाय विविध पक्षी, कीटक, फुलपाखरे, वानरे, हिरवीगार उंचच उंच झाडी, रानमेवा, रानभाज्या या सगळ्यांमुळे येथील जैवविविधता आपल्याला भुरळ पाडते.
या मार्गे गाठा दाऱ्या घाट
* पुणे-मंचर-नारायणगाव-जुन्नर- दाऱ्याघाट 110 किमी
* नाशिक-आळेफाटा-ओतूर-लेण्याद्री-जुन्नर- दाऱ्याघाट 170 किमी
* मुंबई-कल्याण-मुरबाड-मढ-जुन्नर- दाऱ्याघाट 175 किमी
रोमांचित करणारी पर्वणीच
दाऱ्याघाटाचे तीन धबधबे चढून गेल्यानंतर एक विस्तीर्ण तळे दिसते, त्याच्या शेजारूनच खाली कोकणात ठाणे जिल्ह्यात उतरता येते. तर दक्षिणेकडे डोंगर माथ्यावरून ढाकोबा- आंबेहातवीज- दुर्गादेवी किल्ला-देवराई असा घाटमार्ग आहे. हौशी पर्यटकांना रोमांचित करणारा असा हा मार्ग म्हणजे पर्वणीच आहे. दुर्गादेवी येथे घंटेसारखे किणकिणणारे दगड आहेत ते देखील आकर्षणाचा आणि आश्चर्याचा विषय आहेत.
150 वर्षांनंतरही…
भारताचे पहिले वनसंरक्षण अधिकारी अलेक्झांडर गिब्सन यांनी जुन्नर परिसराला “भारताचे आरोग्य केंद्र’ म्हणून संबोधले होते. आज 150 वर्षांनंतरही हा परिसर खरोखरच नैसर्गिक आरोग्य केंद्र म्हणून आपला महिमा टिकवून आहे.
स्थानिकांची इच्छा
सहकुटुंब वर्षाविहार व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दाऱ्याघाट परिसर आदर्श आहे; मात्र इतर प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर जो धांगडधिंगा चालतो, बेजबाबदार वर्तन व अनावश्यक गोष्टी केल्या जातात, त्या येथे होऊ नयेत, पर्यटकांनी येथे यावे, चार घटका जीवनाचा आनंद घ्यावा व हे सौंदर्य मनात साठवून आनंदाने परत जावे हीच येथील स्थानिकांची इच्छा आणि अपेक्षा आहे