पुणे- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे सात हजार रिक्त जागांची भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. अर्हम फाउंडेशन व वास्तव कट्टा यांच्या विद्यमाने संवाद चर्चा सत्रात ते बोलत होते.
मागील दोन वर्षांत करोनामुळे कोणतीही परीक्षा घेता आली नाही, परंतु, आता शासनाने भरती प्रक्रिया जलद पार पाडण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार यावर्षभरात राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या सर्व रिक्त जागांबरोबरच सरळ सेवेतील जागा भरणार आहे. देशात एकूण रोजगाराच्या केवळ पाच टक्केच नोकऱ्या या सरकारी सेवेत आहेत. त्यामुळे विद्यार्थांनी स्पर्धा परीक्षेकडे “प्लॅन बी’ म्हणून पाहावे, असे मत माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी व्यक्त केले. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थांला यश मिळेलच असे नाही त्यामुळे विद्यार्थांनी सरकारी नोकरीचा अट्टाहास न धरता इतरही क्षेत्रात आपले करियर करावे. तसेच प्रशासनाने दरवर्षी रिक्त होणाऱ्या जागा आणि परिक्षेचे योग्य नियोजन करायला हवे पण दुर्देवाने असे होताना दिसत नाही, असेही महेश झगडे म्हणाले.