सासवड -श्रीसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज राष्ट्रीय महामार्ग अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप यांनी विधानसभेच्या निवडणुकीत काम मार्गी लावण्याससंदर्भात आश्वासन दिले होते. पुरंदर तालुक्यातील सतरा गावांचे भूसंपादन होणार होते. सतरा गावांच्या पालखी महामार्गासाठी 68 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार संजय जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
जगताप म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील 17 गावांपैकी 13 गावांचे भूसंपादन प्रक्रिया जानेवारी 2019 मध्ये सुरु केली होती. त्यापैकी सासवड व पवारवाडी वगळता उर्वरित 11 गावांची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सुमारे 236 कोटींची मागणी केली होती. त्यापैकी जेऊर, पिसुर्टी, पिंपरी, दौंडज या चार गावांकरिता 15 कोटींचा निधी फेब्रुवारीमध्ये प्राप्त झाला आहे. करोनामुळे मध्यंतरी वाटपाचे काम थांबले होते. आता वाटप प्रक्रिया सुरू झाली आहे. 68 कोटींपैकी 15 कोटींचे वाटप जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी पूर्ण केली आहे.
चार गावांसाठी 15 कोटींचे वाटप केले आहे. त्या गावांची रक्कम पुढीलप्रमाणे पिसुर्टी (6 कोटी 47 लाख 30 हजार 610 रुपये), पिंपरी खुर्द 2 कोटी 90 लाख 22 हजार 997 रुपये, दौंडज 2 कोटी 85 लाख 27 हजार 700 रुपये, जेऊर 2 कोटी 87 लाख 35 हजार 732 रुपये) एकूण 15 कोटी 10 लाख 17 हजार 39 रुपयांचा निधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
आमदार जगताप म्हणाले की, उर्वरित गावांच्या भूसंपादनासाठी अंदाजे 185 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. पिंपरेखुर्द, पिसुर्टी, जेऊर, दौंडजमधील उर्वरित शेतकऱ्यांनी आपसातील काही किरकोळ वाद असल्यास ते बाजूला ठेऊन तातडीने आवश्यक ते कागदपत्र तसेच बॅंक खात्याचा तपशील भूसंपादन अधिकारी यांच्याकडे जमा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सासवडमध्ये जादा मोबदल्यासाठी प्रयत्न
झेंडेवाडी, काळेवाडी, दिवे येथील नागरिकांचा भूसंपादन प्रक्रियेला विरोध होता. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया पहिल्या टप्प्यात होऊ शकले नाही. भूसंपादन अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व ग्रामस्थांत आमदारांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर ही प्रक्रिया सुरू केली आहे. सासवड नगरपालिका हद्दीतील जमीनधारकांना जास्त मोबदला मिळावा म्हणून गुणांक 1 वरून 2 करण्याबाबत शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत.