नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आज भारतातील कोरोना विषाणू संसर्गाबाबतची अद्यावत माहिती देण्यात आली. यावेळी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील १४ राज्यांमध्ये गेल्या दोन दिवसांत तबलिगी जमातशी संबंधित असलेल्या ६४७ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशभरामध्ये सध्याच्या घडीला कोरोनाचे २३०१ रुग्ण असून यापैकी १५६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत देशातील एकूण ५६ रुग्णांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. दुर्दैवाने कोरोनाबाधितांच्या यादीमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून राज्यात आतापर्यंत ४२३ जणांना याची बाधा झाली आहे. महाराष्ट्रानंतर तामिळनाडू हे करून रुग्णांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून येथे ३०९ रुग्ण आहेत.
चाचण्यांच्या वेगात वाढ
देशामध्ये करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता सरकारकडून चाचण्यांचा वेग देखील वाढवण्यात आला असून मागील २४ तासात करोना संशयित असलेल्या एकूण आठ हजार जणांच्या चाचण्या करण्यात आल्यात. आतापर्यंत देशामध्ये एकादिवसात केलेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत. आतापर्यंत एकूण ६६ हजार नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या असून देशातील १८२ लॅबमध्ये करोना चाचण्या सुरु आहेत.