नवी दिल्ली : देशात कोरोनाची अत्यंत गंभीर स्थिती निर्माण झाली असतानाही केंद्र सरकारच्या पातळीवरून कोणत्याच मोठ्या हालचाली होताना दिसत नाहीत त्याबद्दल संपुर्ण देशातून ओरड निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या सुमारे 100 ख्यातनाम शास्त्रज्ञांनी मोदींनाच पत्र लिहून या गंभीर परिस्थितीत आता तरी काही प्रभावी उपायोजना करा अशी सुचना केली आहे.
वैज्ञानिकांना संशोधन कार्यात सरकारी पातळीवरून मंजुर मिळण्यात मोठ्याच अडचणी निर्माण होत असतात. या अडचणींमुळे संशोधक आणि वैज्ञानिकांना आपले नियोजित काम करण्यातही अडचणी येत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. जे सरकार मध्ये नाहीत त्यांना आयसीएमआरची माहिती दिली जात नाही. कदाचित सरकारमध्ये असणारांनाही ही माहिती दिली जात नसावी अशी आशंकाही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
देशात आत्मनिर्भय भारत योजना मोठ्या प्रमाणात राबवली गेली पण आता अडचणीच्या काळात आपल्याला विदेशातून मदत मागवावी लागत आहे ही दुर्देवी बाब आहे असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. वैज्ञानिकांना नवीन संशोधन चाचण्या आणि अन्य प्रयोग करण्यास सरकारी पातळीवरून प्रचंड अडथळे आणले जात आहेत. त्यामुळे देशातील विषाणुंच्या अभ्यास किंवा संशोधन करण्यास वाव मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी या पत्रात मोदींकडे केली आहे.
या पत्रावर 100 शास्त्रज्ञांच्या स्वाक्षऱ्या आहेत अशी बातमी ‘द हिंदु’ नावाच्या एका राष्ट्रीय इंग्रजी दैनिकाने दिली आहे.