मुंबई – महाराष्ट्र सरकारने येत्या 1 सप्टेंबर पासून पुर्ण क्षमतेने हॉटेल्स सुरू करावीत अशी मागणी हॉटेल्स व रेस्टॉरंट चालकांच्या संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे. या संघटनेचे पश्चिम भारताचे अध्यक्ष गुलबक्षसिंग कोहली यांनी म्हटले आहे की, आज या व्यवसायापुढे अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला आहे.
करोना महामारीचा सर्वात मोठा फटका या क्षेत्राने झेलला आहे. त्यामुळे अधिक मोकळेपणाने या क्षेत्राला आता व्यवसाय करण्यास अनुमती मिळाली पाहिजे. रेस्टॉरंट्स मध्येही दारू विक्रीला अनुमती मिळावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच अशा रेस्टॉरंट्सच्या परिसरातील मोकळ्या जागा आणि टेरेस आदि याठिकाणच्या जागा वापरण्यासही अनुमती आता द्यावी लागेल.
मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन ठेवण्याची अट काढून टाकावी अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे. क्वारंटाइन सेवेसाठी तसेच करोनाच्या सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईतील अनेक हॉटेलांनी आपल्या जागा सरकारला वापरण्यास दिल्या आहेत त्यांना त्याची पुरेशी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.