– रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर (प्रतिनिधी) : भिवेगाव ता.खेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात ५५ वर्षीय शेतकरी ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. लक्ष्मण रामभाऊ वनघरे वय ५५ रा भिवेगाव ता.खेड असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती अशी कि भीमाशंकर जवळील भिवेगाव येथील शेतकरी लक्ष्मण रामभाऊ वनघरे यांचा गावाच्या उत्तरेला जंगल रानात गोठा आहे.
नेहमी प्रमाणे ते गोठ्यातील जनावरांना चारण्यासाठी शेजारील जंगलात जात असत. गुरुवारी दि १९ रोजी ते जनावरे चारण्यासाठी गेले होते. रोज पाच वाजता घरी यायचे मात्र गुरुवारी ते लवकर आले नाहीत म्हणून घरातील त्यांची मुले व पुतणे हे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शोधण्यासाठी गोठा असलेल्या बाजूकडे जंगातून जात असताना त्यानं वाटेत मृत अवस्थेत सापडले. त्यांना उचलण्यासाठी ते पुढे गेले असता जवळच असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर चाल केली मात्र बॅटऱ्या आणि आरडा-ओरडा केल्याने बिबट्या तेथून जंगलात गेला.
बिबट्याने लक्ष्मण वनघरे यांची मान, पाठ आणि मांड्या जवळील भागवार हल्ला केला होता व काही भाग खाल्ला होता ग्रामस्थांच्या मदतीने जंगलातून मृतदेह रुग्णवाहिकेतून राजगुरुनगर येथे शव विच्छेदनसाठी आणण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर भिवेगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंसकार करण्यात आले.
टोकावडे मंडल विभागाचे वनपरी मंडल अधिकारी चेतन नलावडे यांनी सांगितले, उपवन संरक्षक अमित भिसे, सहाय्यक वन संरक्षक संदेश पाटील खेड तालुक्याचे वन अधिकरी उदय रौंधळ, श्रीमती के एस पवार सह वन कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देत नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यासाठी योजना आखली आहे. नरभक्षक बिबटयाला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी भिवेगाव भोरगिरी ग्रामस्थांनी केली आहे.