नागपूर – देशातील २८ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांतील ६०३ नद्यांपैकी ३११ नद्या प्रदूषित असल्याचे दिसून आले आहे. धक्कादायक बाब म्हणून देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांच्या यादीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्रात ५५ नद्या प्रदूषित आहेत.
महाराष्ट्रातील मिठी, मुळा, सावित्री, भीमा, गोदावरी या सर्वाधिक प्रदूषित नद्या असल्याचे समोर आले आहे. त्याखालोखाल १९ नद्यांसह मध्य प्रदेशचा दुसरा क्रमांक लागतो तर त्यानंतर बिहार-१८, केरळ-१८, कर्नाटक -१७ राज्यांचा समावेश आहे.
देशातील नद्यांच्या प्रदुषण नियंत्रणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ नॅशनल वॉटर क्वालिटी मोनिटरिंग प्रोग्रामची अंमलबजावणी करीत असते. या वर्षी ६ जानेवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल अलीकडेच प्रकाशित करण्यात आला आहे.
सर्वाधिक प्रदूषित नद्यांना उपाय योजने नुसार प्राधान्य क्रम १ ते ५ दिला जातो. सर्वाधिक प्रदूषित नदी प्राधान्य १ मध्ये तर सर्वात कमी प्रदूषित नदी प्राधान्य ५ मध्ये समाविष्ट केली जाते.
प्रदुषित नद्यांना स्वच्छ करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाकडून कृती आराखडा तयार केला जातो आणि नदी पुनर्जीवित समिती आणि केंद्रीय निरीक्षण समिती मार्फत प्रगती वर लक्ष ठेवले जाते.
देशातील एकूण प्रदूषित ३११ नद्यात सर्वाधिक प्रदूषित नद्यांची (प्राधान्य १ ) संख्या ४६ तर प्राधान्य २ मध्ये १६ नद्या आणि प्राधान्य ३ मध्ये ३९ नद्या आहेत. कमी प्रदूषित नद्यांतील प्राधान्य ४ मध्ये ६५ नद्या तर प्राधान्य ५ मध्ये १४५ नद्या आहेत.
२०१९ आणि २०२१ ह्या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतेक नद्यांचे १५६ नमुने घेतले त्यातील ५ नदीचे १४७ ठिकाणी घेतलेले नदीस्थळांचे नमुने बीओडी मानकांच्या तपासणीत प्रदूषित आढळले.
महाराष्ट्रातील मिठी, मुळा, सावित्री आणि भीमा ह्या सर्वाधिक प्रदूषित तर त्यानंतर क्रमाने गोदावरी, मुळा, पावना, कन्हान आणि मुळा-मुठा प्रदूषित आढळल्या.
यामुळे नद्या होतात प्रदुषित
उद्योग-सर्व उद्योगांना प्रदूषण नियंत्रण यंत्रणा लावणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही नद्या प्रदूषित होतात कारण उद्योजक प्रदूषण नियंत्रण यंत्रणा एकतर लावत नाहीत लावल्या तर त्या सतत सुरु ठेवत नाहीत किंवा प्रदूषण मंडळाचे लक्ष नाही. सांडपाणी-अलीकडे उद्योगापेक्षा गावे, पालिका आणि महानगर पालिका क्षेत्रातून निघणारे सांडपाणी हे बहुतेक नद्या प्रदुषणास कारणीभूत आहेत.
ह्या सांडपाण्यात मोठ्या प्रमाणावर तेल, डीटरजंट, विविध जड धातू, रसायने, शहरातील नाल्यावाटे वाहत आलेला प्लॅस्टिक-जैविक कचरा असतो. कृषी : शेतीमधील किटकनाशके, रासायनिक खते, प्राण्यांची विष्ठा आणि जैविक कचरा हा नद्यांच्या सर्वसाधारण प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर भर घालतात.