पाचगणी -मांघर हे देशातील पहिले “मधाचे गाव’ ठरणार असून, या गावाचा 52 लाख 25 हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करताना, निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करा, असे आवाहन महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी केले.
“मधाच्या गावा’साठी प्रशासनाने तयार केलेल्या कृती आराखड्याची माहिती ग्रामस्थांना देण्यासाठी खादी व ग्रामाद्योग मंडळाच्या खादी भवनात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. गटविकास अधिकारी अरुण मरभळ, खादी ग्रामोद्योगचे संचालक दिग्विजय पाटील, वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी, मांघरचे ज्येष्ठ नागरिक महादेव जाधव, विजय जाधव, गणेश जाधव, राजेंद्र चोरगे, संजय जाधव, योगेश पार्टे, राजेंद्र जाधव, मारुती जाधव, बबन जाधव, अजित जाधव उपस्थित होते. दिग्विजय पाटील यांनी कृती आराखडा बैठकीत सादर केला. या आराखड्यानुसार मांघरची माहिती असलेले फलक लावण्यात येणार आहेत.
संपूर्ण गावातील घरे आकर्षक रंगात रंगवली जाणार आहेत. पर्यटकांच्या स्वागतासाठी गावाच्या वेशीवर भव्य कमान उभारण्यात येणार आहे. मध प्रशिक्षण, संग्रहालय, मध प्रक्रिया इमारत, ग्रामपंचायत इमारतीची देखभाल, दुरुस्ती, मध प्रक्रिया यंत्रसामग्री, बॉटल फिलिंग यंत्र, मेणपत्रा तयार करणारे सयंत्र आदी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गावात मधमाशा व मधौषधी उद्यान तयार करण्यात येणार आहे. मधमाशी उत्पादन केंद्र, मध पयर्टन केंद्र उभारण्यात येणार आहे. मधमाशांच्या वसाहतींच्या स्थलांतरासंदर्भात मधपाळांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. सेंद्रिय मध संकलनाचे प्रशिक्षणदेखील देण्यात येणार आहे. या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळणार असल्याची माहिती सुषमा चौधरी-पाटील यांनी दिली.
मांघर गाव निसर्गाच्या कुशीत वसले आहे. येथील निसर्गाला धक्का लागणार नाही, त्याचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी ग्रामस्थांनी घ्यावी. गावात प्लॅस्टिकवर पूर्ण बंदी घाला. ओल्या व सुक्या कचऱ्याचे नियोजन करा आणि जागा मिळेल तेथे वृक्ष लागवड व संवर्धन करा, असे आवाहनही त्यांनी केले.