वरवंड येथील महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
वरवंड- बोंड आळींचे अनुदान, पीक विम्याचे अनुदान, वेगवेगळ्या पिकांचे अनुदान, दुध अनुदान, लष्करी अळीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदानातून शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारच्या काळात सुमारे 50 हजार कोटी दिले आहेत. सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. महाराष्ट्र राज्यात हजारो कोटींचे रस्ते बनवले जात आहेत. मोठ्या प्रमाणात शेती सिंचनाची व्यवस्था केली जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दौंड तालुक्यातील वरवंड येथे महाजनादेश यात्रेनिमित्त बाजार मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल कुल, कांचन कुल, आमदार सुजितसिह ठाकूर, माजी आमदार रंजना कुल, दौंडच्या नगराध्यक्षा शीतल कटारिया, भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे, प्रेमसुख कटारिया, रासपचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तानाजी दिवेकर, दौंड तालुकाध्यक्ष गणेश आखाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, पवारांच्या अधिपत्याखाली जी कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. ती कामे आमदार राहुल कुल यांनी आपल्या सरकारच्या कार्यकाळात पूर्ण केली आहेत.
आमदार राहूल कुल म्हणाले की, पूर्वीच्या काळी खराब रस्ते सुरू झाले की दौंड तालुका सुरू झाला, असे म्हटले जायचे. आगामी काळात जेथून चांगला रस्ता होता सुरू होतो. तिथून दौंड तालुका सुरू होतो, अशी ओळख दौंडची असेल. मुख्यमंत्री फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. यावेळी नंदू पवार, तानाजी दिवेकर, गणेश भेगडे यांनी मनोगत व्यक्त केले.
- कुलांच्या लीडवरच जबाबदारी देऊ
येणाऱ्या काळात आपलेच सरकार येणार आहे. या सरकारमध्ये कुल यांना अशी जबाबदारी देऊ की, कुल हे मागणी करणारे नाही तर मागणी पूर्ण करणारे असतील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. मात्र यासाठी एकच अट आहे. आमदरकीला मागच्यावेळेपेक्षा यावेळी तीनपट अधिक लीड दिले तर राहुल यांना मागण्या करण्याची गरज नाही तर ते मागण्या पूर्ण करणारे राहुल कुल असतील.