बुध – खटाव तालुक्यातील उत्तर भागात रब्बी हंगामातील गरवा कांद्याची लागण मोठ्या प्रमाणात होत असते. हजारो एकर क्षेत्रावर गतवर्षी घेतलेला सुमारे 500 ट्रक कांदा केवळ दर व मागणीअभावी अद्यापही ऐरणीत पडून आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला असून साठवलेला कांदा सडू लागल्याने उकिरड्यावर कांदा फेकून द्यायची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे पुसेगाव परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.
संचारबंदी लागू होण्यापूर्वी काही दिवस कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळत होता. मात्र, सद्यस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसह विविध कारणांमुळे कांद्याचे भाव चांगलेच कोसळले आहेत. यावर्षी उन्हाळी कांद्यांचे चांगले उत्पादन झाले.
कांद्याचे बाजारभाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी तीन- चार महिन्यांपासून ऐरणीत तसेच पुसेगाव येथील मार्केट कमिटीच्या गोडाऊनमध्ये कांदा साठवून ठेवला आहे. हा साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांना कांद्याची विक्री मातीमोल भावात करावी लागत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.
मागील वर्षी पाऊसकाळ चांगला झाल्याने येथील शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली होती. कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा कांद्याची रोपे तयार करण्यापासून ते लागवड करण्यावर खूप मोठा खर्च झाला आहे. त्यातच कांद्याचे पीक काढण्यासाठी तयार झाले असतानाच करोनाचे संकट कोसळले.
टाळेबंदी लागू करण्यात आली. यातून शेतीकामे वगळली असली तरी त्याचा विपरीत परिणाम झाला. कांदा काढण्यासाठी वेळेत मजूर मिळाले नाहीत. जे मजूर कामावर आले, त्यांनी दुप्पट मजुरी घेतली. शेतकऱ्यांनी अथक परिश्रमाने कांदा काढणी केली. मात्र, त्यानंतर कांदा खरेदीला व्यापारी उत्सुकुनव्हते. काही व्यापाऱ्यांकडून अत्यल्प भावात कांद्याची खरेदी करण्यात आली.
यामुळे काही शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवला. कांदा साठवण्यासाठी साधन नसल्याने काहींनी बाजारात मिळेल त्या भावात कांदा विक्री केली. सध्या कांद्याला किलोमागे सहा ते सात रुपये बाजारभाव आहे. बाजारभावच वाढत नसल्याने साठवून ठेवलेला कांदा शेतकरी विक्रीसाठी काढत आहेत. परंतु, साठवलेला कांदा सडला असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या या प्रश्नांकडे लक्ष देऊन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.
वाद्यव्यवसाय ठप्प झाल्याने मागणी कमी
पाणीपुरीच्या गाडीपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत सर्वच खाद्यपदार्थ व्यवसायाच्या ठिकाणी कांद्याचा उपयोग होतो. करोनामुळे तीन महिन्यांपासून टाळेबंदी लागू केल्याने हॉटेलसह सर्व व्यवसाय, उद्योग ठप्प झाले आहेत. परिणामी, कांद्याची मागणी कमी आहे. उत्पादन जास्त व मागणी कमी असल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.