तुमाकुरू (कर्नाटक) – येथील सदाशिवनगर येथे एकाच कुटुंबातील पाच जणांनी आर्थिक अडचणींना कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला सावकाराकडून त्रास दिला जात असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सकृत दर्शनी दिसून आले आहे.
गरीब साब (वय४६) आणि पत्नी सुमैया (33) या दाम्पत्याने जिरा (वय १४), मोहम्मद सुभान (११) आणि महंमद मुनीर (९) या मुलांची हत्या करून नंतर स्वता आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कुटुंब प्रमुख गरीब साब याने गळफास घेण्यापुर्वी एक व्हिडीओ बनवला असून त्यात त्याने आपली कहाणी कथन केली आहे.
गरीब साब हा तुमकुरूच्या शिरा तालुक्यातील लक्केनहल्ली गावचा आहे. उदरनिर्वाहासाठी तो ‘कबाब’ विकत होता.त्याने सावकाराकडून पैसे व्याजाने घेतले होते परंतु त्याची परत फेड तो करू शकत नव्हता. त्यामुळे सावकरांकडून त्याच्याकडे सतत तगादा लावण्यात आला होता.