मुंबई – यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदान करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक अनुयायी नवी मुंबईतील खारघरमध्ये आले होते. मात्र हा सोहळा रणरणत्या उन्हात घेण्यात आला होता. यामुळे उष्माघाताने तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. या प्रकरणाची दखल घेत राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. याशिवाय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहोळ्यात सहभागी काही श्रीसदस्यांचे उष्माघातामुळे मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी या साधकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये राज्य सरकारमार्फत दिले जातील.”
“जे लोक उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली आणि डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन संपूर्ण समन्वय ठेवत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही सातत्याने संपर्क साधत आहे.”
ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला गालबोट -उद्धव ठाकरे
या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे. “कार्यक्रमाच्या चुकीची वेळ कोणी दिली? ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला गालबोट लागलं. सरकार या घटनेची चौकशी करेल की नाही माहिती नाही. पण, अमित शाहांना दौऱ्यासाठी जायचं असल्याने हा कार्यक्रम भर दुपारी घेतला असेल, तर याची चौकशी कोण करणार? या घटनेत निरपराध जीव गेले आहेत. अमित शाहांना वेळ नसल्याने जर हा कार्यक्रम दुपारी ठेवला असेल, तर विचित्र प्रकार आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.