पुणे – “नेट’ परीक्षेच्या तयारीसाठी हैदराबाद येथे गेलेल्या आणि दीड महिन्यांपासून अडकून पडलेल्या 49 महाविद्यालयीन युवतींना खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात परतणे शक्य झाले. या सर्व मुलींसोबत असलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रज्ञा साळुंखे आणि येवला तालुक्यातील विद्या मामुडे या युवतींनी याबाबत माहिती दिली. या सर्व मुली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील आहेत.
सर्वजणी हैदराबाद येथील एका संस्थेत क्लाससाठी त्या गेल्या होत्या. क्लासचा कालावधी संपला असतानाच करोना विषाणूमुळे देशभरात टाळेबंदी लागू झाली; आणि या मुली हैदराबाद येथेच अडकून पडल्या. अखेर या मुलींनी सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली आणि आपल्याला महाराष्ट्रात येण्यासाठी मदत करावी, अशी विनंती केली. त्यानुसार सुळे यांनी लागलीच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून, याबाबत माहिती देत दोन्ही राज्यांच्या प्रशासनाशी पाठपुरावा केला आणि या मुलींच्या प्रवासासाठी विशेष परवानगी मिळवली.