पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असल्याचे जाहीर करा
नवी दिल्ली, दि. 10 – पाणी ही “राष्ट्रीय संपत्ती’ असल्याचे सरकारने जाहीर करावे; पाणी वाटपाबाबतचे लोंबकळत पडलेले तंटे लवकर सोडविण्यासाठी हे आवश्यक आहे, अशी जोरदार मागणी आज लोकसभेत करण्यात आली. पाटबंधारे खात्याचे उपमंत्री के. एन. सिंग यावर म्हणाले की पाणी ही “राष्ट्रीय संपत्ती’ असल्याचे जाहीर करण्याबाबत केंद्राने राज्यांशी संपर्क साधलेला आहे.
तिबेट स्वतंत्र करण्यासाठी हिंदने युनोत दाद मागावी
नवी दिल्ली – तिबेट स्वतंत्र करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रसंघात दाद मागावी अशी मागणी आज येथे तिबेटी लोकांनी केलेल्या निदर्शनात करण्यात आली.
पूर्व प्राथमिकपासून सर्व शिक्षण मोफत करा
पुणे – पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्चतर शिक्षण मोफत करावे, अशा स्वरूपाची मागणी शासनाकडे करणारा ठराव आज मनपा सभेत एकमताने मंजूर झाला.
हिंदी महासागर शांतता विभागच हवा
मुंबई – हिंदी महासागर हा शांतता विभागच राहिला पाहिजे आणि त्यासाठी दडपणाविरुद्ध लढण्यास देशाने सिद्ध राहिले पाहिजे, असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी म्हटले. त्या पुढे म्हणाल्या, सागरी सीमेवरून होणारे कोणतेही आक्रमण परतविण्यास भारतीय नौदल समर्थ आहे. पण देशात ऐक्य नसल्यास कोणताही देश स्वातंत्र्यरक्षण करू शकणार नाही.