कॉंग्रेस पक्षातच राहणार
सातारा, दि. 14 – कॉंग्रेस पक्ष भारतीय समाजाच्या इच्छाआकांक्षाचे प्रतीक असल्याने ही मोठी संघटना सोडणे म्हणजे जनतेकडे डोळेझाक करणे होय, असे उद्गार यशवंतराव चव्हाण यांनी जाहीर सभेत बोलताना काढले.
सातारा या आपल्या मतदार संघात चव्हाण प्रचार सभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, मी कॉंग्रेस पक्ष सोडीत नाही म्हणून काही लोक माझ्यावर टीका करतात व मी माझ्या मार्गापासून ढळल्यास माझ्यावर हल्ला करतात. माझी कॉंग्रेसवर अंधश्रद्धा नाही. कॉंग्रेसच्या तत्त्वावर माझा विश्वास आहे म्हणून मी कॉंग्रेसला चिकटून राहणार.
बॉम्बे हाय तेल क्षेत्राचा विकास
मुंबई – “बॉम्बे हाय’ तेल क्षेत्राच्या विकासाचा तिसरा टप्पा म्हणून तेल व नैसर्गिक वायू आयोगाने 500 कोटी रुपयांची एक महत्त्वाकांक्षी योजना निश्चित केली आहे. बॉम्बे हाय भागातून मुंबई किनाऱ्यापर्यंत अशुद्ध तेल वाहून नेण्यासाठी नळ टाकण्याचा या योजनेत समावेश आहे.
त्यासाठी 250 कोटी रुपये खर्च येईल. 160 किमी हून अधिक लांबीचे हे नळ टाकण्यात येतील. बॉम्बे हाय भागातून रोज 1,20,000 बॅरल्स अशुद्ध तेल उत्पादन करण्याची क्षमता निर्माण केली जाईल.