मुंबई – “वंदे भारत’ अभियानांतर्गत 30 फ्लाईटसने 19 देशातील 4013 नागरिक राज्यत दाखल झाले असून सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मायदेशी परतलेल्या या नागरिकांमध्ये 1309 नागरिक मुंबईतील आहेत. तर उर्वरित राज्यीाल प्रवाशांची संख्या 1691 इतकी आहे. तसेच इतर राज्यातील 1013 प्रवासी आहेत.
“वंदे भारत’ अभियान टप्पा 3 अंतर्गत एअर इंडियाने 30 जून 2020 पर्यंत 38 फ्लाईट्सचे नियोजन केले आहे. या मिशनअंतर्गत अतिरिक्त चार्टर फ्लाईटसची ही व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यात अमेरिका, रशिया, मध्य आशिया, युरोप आणि आखाती देशांमधून मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या उड्डाणांचा समावेश आहे. दोहा येथून पुढील सात दिवसांत 3 चार्टर विमानांच्या सहाय्याने खाडीमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले जाईल. ऑस्ट्रेलियासाठी “वंदे भारत’ अभियानांतर्गत फ्लाईट उपलब्ध करून देण्याबाबत विदेश मंत्रालयाकडे मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगानिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलॅंड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलॅंड या देशातून हे नागरिक मायदेशी परतले आहेत.