हनोई – व्हिएतनाममध्ये मोलावे चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे किमान 35 जणांचा मृत्यू झाला असून 50 पेक्षा अधिक जण बेपत्ता झाले आहेत. सरकारी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
व्हिएतनाममध्ये थडकलेले गेल्या 20 वर्षांतील हे सर्वात ताकदवान चक्रीवादळ होते. या वादळामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. समुद्रातील अनेक बोटी बुडाल्या आणि किमान 17 लाख लोकसंख्येचा वीजपुरवठा खंडित झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
देशाच्या मध्य प्रांतातील तीन गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला असून तेथील बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे. या गावांमध्ये दरडी कोसळल्याने किमान 19 जणांचा मृत्यू झाला असून माती आणि चिखलाच्या ढिगाऱ्यांखाली अन्य 40 जण गाडले गेल्याचा संशय आहे.
उपपंतप्रधान त्रिन्ह डिन्ह डंग यांनी या गावांचा दौरा करून बचाव आणि मदत कार्याची पाहाणी केली. या ठिकाणचे मातीचे ढिगारे हलवण्यासाठी बुलडोझरचा वापर केला जात आहे. ढिगारे हटवण्यासाठी अधिक कुमक पाठवण्याचे आदेशही डंग यांनी दिले आहेत.
ज्यांच्या बोटी समुद्रात बुडाल्या अशा 12 मच्छीमारांचाही मृतांमध्ये समावेश आहे. आणखी 14 मच्छीमार अजूनही बेपत्ता आहेत. काही भागातील नुकसान व जीवितहानीची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही त्यामुळे देशभरात मृतांची संख्या वाढू शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.