सोमाटणे – जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी कर्मचार्यांनी गेल्या महिन्याभरापासून विविध मागण्यासाठी संप पुकारला असल्याने 4 डिसेंबरपासून अंगणवाडीला कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच खेड्यापाडयातील गावात अंगणवाडीचा खाऊच शिजवला जात नसून मातांनाही पोषण आहाराचा पुरवठा गेल्या महिन्याभरापासून होत नाही.यामुळे बालेक व गर्भवती मातांना फटका बसत आहे.शिवाय नवीन जन्म नवमाता यांच्या नोंदी बंद आहेत.
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी चार डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचार्यांनी आंदोलन पुकारले असून त्याचा फटका कुपोषित बालके आणि गर्भवती मातांना बसत आहे. बालके व मातांना आवश्यक असलेला पोषण आहार बंद असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आठ डिसेंबरला सीटूच्या नेतृत्वाखाली अंगणवाड़ी शहरी व ग्रामीण प्रकल्पातील सेविका व मदतनिसांनी मोर्चा काढला होता.
मात्र तरीही शासनाकडून कोणतीच मागणी मान्य करण्यात आली नाही. याशिवाय हिवाळी अधिवेशनावरदेखील मोर्चा काढण्यात आला. तरीदेखील या आंदोलनावर तोडगा निघाला नसल्याने तालुक्यात असलेले कुपोषित बालके आणि गर्भवती मातांना मिळणारा पोषण आहार बंद झाला आहे. यामुळे कुपोषित बालकांचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच लहान बालकांना संस्काराचे मिळणारे धडे बंद झाले आहेत. शाळेची जी तयारी अंगणवाडीत होते तीला खंड पडत आहे. जर देशाचे भावी नागरिकच असे महिना महिना घरात बसले तर जबाबदार नागरिक कसे होणार असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
बचतगटांमार्फत पोषण आहार पुरवठा
तालुक्यातील 340 अंगणवाड्या बंद आहेत. परंतु आम्ही सोमवारपासून गावातील प्राथमिक शाळा व बचत गटांमार्फत पोषण आहार देण्याची व्यवस्था करतोय जेणेकरून बालके, स्तनदा माता व गर्भवती महिलांच्या पोषण आहारात खंड पडणार नाही.
– विशाल कोतागडे,बालविकास प्रकल्प अधिकारी मावळ तालुका