नवी दिल्ली: देशभरातील तब्बल 31.6 लाख लोक सध्या क्वॉरंटाईन करण्यात अलेले आहेत. देशभरात आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक लोकांना करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. करोनाच्या प्रादुर्भावाला नियंत्रित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी या सर्वांना गृह विलगीकरणात अथवा संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या या 31 लाख जणांमध्ये सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशातील नागरिकांची आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात 11 लाखांपेक्षा अधिक लोकांना क्वॉरंटाईन करण्यात अले आहे. तर महाराष्ट्रात 7.27 लाख, गुजरातमध्ये 3.25 लाख आणि ओडिशामध्ये 2.4 लाख जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. असे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
त्यात कोविड-19 चे संशयित रुग्ण, लक्षण न दिसणारे आणि सौम्य लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांनाही विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी विलगीकरणात ठेवले गेलेले आहे.
दिल्लीत, सौम्य आणि लक्षणे न दिसणाऱ्या करोनाच्या रूग्णांना घरीच अलग ठेवण्याची परवानगी दिली गेली आहे आणि दूरध्वनी किंवा व्हिडिओ कॉलद्वारे तज्ञांकडून त्यांच्या प्रकृतीवर सतत देखरेख केली जात आहे.
हरियाणामध्ये तब्बल 49,907, तामिळनाडूमध्ये 46,969, छत्तीसगडमध्ये 41,062 आणि पंजाबमध्ये 25,307 लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर झारखंडमध्ये 24,497,
कर्नाटकमध्ये 17,858, दिल्लीत 14,596 आणि आसाममध्ये 8,799 जणांना विलगीकरणात ठेवले गेले आहे. दिल्ली, केरळ, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये करोनाला नियंत्रित करण्याच्या दृष्टीने सकारात्मक कल आढळून येत आहेत, असे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले अहे.