अलिबाग – रायगड जिल्ह्यातील रेवदंडा आणि मुरूड तालुक्यामधील काही गावांमध्ये पिल्लांसह 30 कुत्री मृतावस्थेत आढळली. त्याना विष देऊन मारल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी मुरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेमक्या कोणत्या विषाचा वापर या कुत्र्यांना मारण्यासाठी केला असावा, हे शोधण्यासाठी याचा शोध घेण्यासाठी तपासणीसाठी नमुने कलिना येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदनात श्वानांच्या फुफ्फुसात काळे डाग आढळल्याची माहिती पशुधन पर्यवेक्षक डॉ. विनायक पवार यांनी सांगितले.
मुरूडमधील काशिद सर्वे येथील तरुण स्वप्नील सांगळे यांनी सांगितले की, माझ्या मोटरसायकलचा आवाज ऐकल्याबरोबर सर्व श्वान जमा होत माझ्या भोवती गोळा होत. मी या श्वानांना खायला खालत असे. मात्र शनिवारी एकही श्वान पळत आला नाही. सहा पिल्लांसह त्यांच्या आई दिसल्या नाहीत. बाजूच्या झुडुपात एक पिल्लू मरून पडलेले मी पाहिले आणि त्याच्या बाजूला एक जिवंत पिल्लू निपचित पडलेले होते. त्यांची आई जवळ नव्हती. त्यानंतर मी मुरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
काही दिवसांपूर्वी रेवदंडा आणि काशिद येथे काही श्वान मरून पडल्याचे आढळले होते. आता या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालेली आहे, अशी माहिती पेटाचे स्वयंसेवक शशिकांत पुरोहित यांनी दिली.