जयपूर :- राजस्थान ते मणिपूरपर्यंत शुक्रवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. एकीकडे राजस्थानमध्ये एका तासातच वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत होते, तर दुसरीकडे मणिपूरही भूकंपामुळे हादरले होते.
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये तासाभरात तीनदा जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक घराबाहेर पडताना दिसले. जयपूरमध्ये रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता अनुक्रमे 3.1, 3.4 आणि 4.4 इतकी नोंद करण्यात आली.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी म्हणजेच आज पहाटे जयपूर शहरात एका तासाच्या कालावधीत तीन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता तीन वेळा स्वतंत्रपणे मोजली गेली.
जयपूरमध्ये पहाटे 4.25 मिनिटांनी तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली. या भूकंपाची खोली 10 किलोमीटर इतकी होती.
तत्पूर्वी, 4.22 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले होते, ज्याची तीव्रता 3.4 इतकी मोजली गेली. तर, 4.09 मिनिटांनी सर्वात शक्तिशाली भूकंप आला. या तिन्ही भूकंपांच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की झोपलेले लोकही जागे झाले आणि घराबाहेर पळताना दिसले.
मणिपूरमध्येही आज पहाटे भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मणिपूरच्या उखरुलमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी मोजली गेली.