रेडा – इंदापूर तालुक्यातील दुष्काळी भागातील 22 गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. शेकडो एकर ओसाड असलेली माळरान शेती चक्क हिरवीगार बागायती होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संकल्पनेतील उजनी धरणातील पाण्यासंदर्भात नुसता होकार दिला नाही तर, चक्क या योजनेवर मंजुरीची स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे शेकडो वर्षांचे स्वप्न तालुक्यातील शेतकऱ्यांचे साकार होणार आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील 22 गावांतील शेतीसह खडकवासला कालव्यावरील शेती सिचंनासाठी उजनी जलाशयातून पाच टीएमसी पाणी उचलण्याकरिता राज्य शासनाने परवानगी दिली असून या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी झाली आहे. दरम्यान, जलसंपदा मंत्रालयाने याबाबत शासन निर्णय पारित केला आहे.
इंदापूर तालुक्यातील 22 गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला होता. दरम्यान, केलेल्या प्रयत्नाना यश आले असून गुरुवारी (दि. 22) या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अंतिम स्वाक्षरी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
पाण्याचे नियोजन; योजनेस दोन वर्षे लागणार
कुंभारगांव परिसरातील उजनी जलाशयातून 10 हजार एच.पी. क्षमतेच्या विद्युत पंपाद्वारे पाणी उचलले जाणार असून ते पाणी सुमारे 10 कि.मी. अंतरावरील शेटफळगढे परिसरातील खडकवासला कालव्यात टाकले जाणार आहे. तेथून हे पाणी सणसर कटद्वारे नीरा डाव्या कालव्यावरील 22 गावांतील शेती सिंचनासाठी वापरले जाणार आहे.
तर खडकवासला कालव्यातून इंदापूरपर्यंतच्या शेती सिंचनासाठीही पाणी वापरले जाणार आहे. दोन्ही कालव्यावरील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेसाठी सुमारे 600 कोटी रुपयेचा निधी खर्च होणार असून या योजनेसाठी दोन वर्षांचा कालावधी जाणार असल्याचे राज्यमंत्री भरणे यांनी नमूद केले.
योजनेचा सर्व्हे तातडीने होणार
या योजनेचा सर्व्हे तातडीने सुरू होणार असून येत्या चार महिन्यांमध्ये सर्व्हे पूर्ण केला जाणार असून तद्नंतर प्रत्यक्षात योजनेचे काम सुरू होणार आहे.