शिरूर : पुणे ,मुंबई ,करमाळा व इतर ठिकाणाहून शिरूर शहरात प्रवेश करणाऱ्या 21 नागरिकांची माहिती मिळाल्यावर शिरुर नगर परिषद व शिरूर ग्रामीण रुग्णालयाने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी क्वरनटाईन केले आहे. तसेचया नागरिकांवर ग्रामीण रुग्णालय यांची नजर रहाणार असल्याचे शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
शिरूर शहरात रात्रीच्या वेळेस गुपचूप प्रवेश करीत असल्याची बातमी दैनिक ‘प्रभात’ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती. यावर कालपर्यंत शिरूर शहरात गुपचूप प्रवेश करणारे 21 नागरिक आढळले असून, या सर्व नागरिकांना कवरांटाईन केले आहे.हे नागरिक गुजरात राज्यातील वाफी, पुणे, मुंबई, करमाळा व इतर ठिकाणाहून शहरात आले आहेत. या नागरिकांची माहिती मिळाल्यानंतर शिरूर नगर परिषदेच्या वतीने माहिती घेऊन त्यांना काल क्वारंटाईन करण्यात आले आहे.
काल पाच नागरिकांना तर आज सोळा जणांना नगरपरिषद, ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने आरक्षित केलेल्या विविध ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहे.शिरूरमध्ये पुणे, मुंबई, व इतर ठिकाणाहून रात्रीच्या वेळेस अनेक जण शहरात आपापल्या नातेवाइकांकडे येत आहेत. हे नागरिक संसर्ग बाधित क्षेत्रातून येत आहेत. शहरातील नागरिकांनी आपल्याकडे कुठल्याही नातेवाईक पाहुण्यांना बोलू नये,कोणी आपल्याकडे आले तर त्याची माहिती त्वरित शिरुर नगर परिषद द्यावी, असं आवाहन करण्यात आले आहे.
तसेच माहिती लपवणाऱ्या नागरिकावर कडक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिला आहे. दरम्यान, काल मुंबई वरून काही लोक शहरातील एका नागरिका कडे आले होते. अशा एका नागरिकावर आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचेही मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
भाजीपाला विक्री बाजार उद्या पासून बंद
शिरूर शहरात सोशल डिस्टेंशिंग बाबत अनेक वेळा सांगूनही नागरिकांनी ऐकत नसल्याने, तहसीलदार लैला शेख यांनी दिलेल्या आदेशानुसार शिरुर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भरवण्यात येणारा भाजीपाला व फळे विक्री बाजार उद्या दिनांक 30 एप्रिल पासून बंद करण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
शिरूर शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाव्हायरस बाधित क्षेत्रातून नागरिक येत असून यामुळे शिरूर शहराला संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी जागृत राहणे गरजेचे आहे. शहरात आलेल्या नागरिकांची माहिती त्वरित प्रशासनाला देणे गरजेचे आहे.
तुषार पाटील वैद्यकीय अधीक्षक शिरूर ग्रामीण रुग्णालय