पिंपरी, (प्रतिनिधी)- पिंपरी-चिंचवड शहराची आगामी 40 वर्षांत होणारी लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करुन प्रस्तावित 200 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाला चालना देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पातून 267 एमएलडी पाणी उपलब्ध करण्यासाठी भाजपा सत्ताकाळात प्रकल्प हाती घेण्यात आले. त्याअंतर्गत चिखली येथे 100 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वयीत झाला असून, त्याद्वारे समाविष्ट गावांसह पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र अद्यापही 167 एमएलडी पाण्याची शहराला गरज भासत आहे. मात्र हे पाणी शहरात आणून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पाची उबारणी केली नसल्याने त्याचा थेट परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.
शहरातील आगामी 40 वर्षांतील वाढत्या नागरिकरणाचा विचार करुन भामा आसखेड धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी पिंपरी-चिंचवड शहरात आणण्यात येणार आहे. त्या अंतर्गत 100 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वीत करुन त्याचे लोकार्पण झाले आहे. आता चिखली येथील प्रस्तावित 200 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू करावी.
आगामी काळात होणारी लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करत, याबाबत महिनाभरापूर्वी आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित अधिकार्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर आयुक्तांनी शुक्रवारी (दि.15) या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. शहराची लोकसंख्या सुमारे 30 लाखांच्या घरात आहे. चिखली, तळवडे, मोशी, चर्होली, दिघी, डुडूळगाव, जाधववाडी या गावातील पाणी प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे.
या गावांना होणार फायदा
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 1997 साली झालेल्या समावेशानंतर गेल्या दशकात तळवडे, चिखली, मोशी, चर्होली आणि दिघी या गावांमधीळ नागरीकरणाने मोठा वेग घेतला आहे. एकीकडे गगनचुंबी इमारती तर दुसरीकडे नागरी सुविधांचा अभवा असे अठनक ठिकाणी चित्र दिसत आहे. या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर या समाविष्ट गावांना याचा फायदा होणारअ ाहे.