कराड – अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावार वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी सुशांत ऊर्फ बबलू मारुती नाईक (वय 33, रा. रत्नागिरी गोडाऊनमागे, मार्केट यार्ड, कराड) याला 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. येथील जिल्हा व सत्र विशेष न्या. के. एस. होरे यांनी ही शिक्षा सुनावली.
याबाबत सरकार पक्षाच्यावतीने देण्यात आलेली माहिती अशी की, आरोपी बबलू नाईक याने पिडीतेला विवाहाचे अमिष दाखवून तिला पळवून नेले होते. त्यानंतर सांगली व सातारा येथे अनुक्रमे 9 व 3 दिवस वास्तव्य करुन त्याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच त्याने संबंधित अल्पवयीन मुलीला जेजुरीला नेऊन तिच्याशी लग्न केले. त्यानंतर पुण्यातही काही काळ तो वास्तव्यास होता.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कराड शहर पोलिसांनी सुशांत ऊर्फ बबलू नाईक याला अटक केली. तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हणुमंत गायकवाड व पोलीस निरीक्षक गुंजवटे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ऍड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. या खटल्यात बारा साक्षीदार तपासले. पिडीत मुलगी व तिच्या आईच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. आरोपीचा वैद्यकीय अहवाल, तसेच त्याने स्वत: पोलिसांसमोर दिलेले निवेदन, पंचनामा यावरुन न्यायालयाने आरोपीला दोषी धरुन विविध कलमांखाली त्याला 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.