सातारा – गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने तब्बल दीडशेहून अधिक जागांसह बहुमत मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भविष्यकालीन धोरणावर आणि कार्यपद्धतीवर हा जनतेने दाखवलेला विश्वास आहे. या निकालावरूनच देशाचे पुढील भवितव्य 2024 च्या निवडणुकीत निश्चितच ठरवले जाईल, असा विश्वास महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
येथील कोयना दौलत या निवासस्थानी देसाई यांनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधत गुजरातच्या निवडणूक प्रक्रियेवर भाष्य केले. देसाई म्हणाले, “”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यशैलीमधून देशाची भविष्यकालीन स्थिती काय आहे हे त्यांच्या नेतृत्वगुणातून सिद्ध केले आहे. पंतप्रधान मोदींचे व्हिजन, विचार, नेतृत्वक्षमता यावर गुजरातच्या जनतेने या निकालांच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या संघटनात्मक प्रयत्नांचा परिणाम म्हणून गुजरातमध्ये भाजपला दीडशेहून अधिक जागा मिळाल्या आहेत. हा भाजपच्या संघटन शक्तीचा विजय आहे. गुजरातचा निकाल देशाला 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निश्चित दिशा देणार आहे.” 2024 च्या निवडणुकीतही भाजपचा असाच वरचष्मा दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोक विकासाच्या मागे उभे राहतात…
देशातील जनतेला अपेक्षित विकास होत आहे. राज्य पुढे जात असताना जागतिक पातळीवर एक नेतृत्व शक्ती म्हणून देश पुढे येत आहे. त्यामुळे मोदींच्या विचारांच्या पाठीशी जनता उभी राहिली आहे. कोणी कितीही यात्रा काढल्या तरी लोक विकासाच्या मागे उभे राहतात, हे या निकालातून सिद्ध झाले आहे, असे देसाई यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची खिल्ली उडवताना देसाई म्हणाले, “कितीही कोणी यात्रा काढल्या, कोणाच्या पाठीमागे राहायचा प्रयत्न केला, कोणाच्या हातात हात घालून कोणी चालला तरी काही फरक पडत नाही. हे या गुजरातच्या निकालाने स्पष्ट केले आहे.”