लखीमपूर खेरी – उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) 2 शेतकऱ्यांना अटक केली आहे. या हत्येप्रकरणी एकूण 6 जणांची अटक करण्यात आली आहे. तसेच एकूणच लखीमपूर खेरी प्रकरणात आतापर्यंत 13 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
कमलजीत सिंग (29 वर्षे) आणि कंवलजीत सिंग उर्फ सोनू (35 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या शेतक-यांची नावे आहेत. एसआयटीने याआधी स्थानिकांकडून माहिती मिळावी म्हणून या प्रकरणातील संशयित आरोपींचे फोटो भिंतींवर चिकटवले होते. त्यात या दोन शेतकऱ्यांचे फोटो देखील होते. मात्र, त्यांना अद्याप अटक झालेली नव्हती. याआधी विचित्र सिंग, गुरविंदर सिंग, अवतार सिंग, रंजित सिंग यांना अटक झाली आहे.
दरम्यान, लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणं हा विचारपूर्वक केलेल्या नियोजित कटाचा भाग होता, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने म्हटले होते. या प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाच्या प्रमुखांनी न्यायाधीशांना याबाबत चिट्ठी लिहिली होती.
यात आशीष मिश्राविरोधातील आरोप दुरुस्त केले पाहिजे असं म्हटलं होतं. या प्रकरणी आशीष मिश्रा आणि त्याचे इतर सहकारी हत्या आणि कटाच्या आरोपांचा सामना करत आहेत. यात हत्येचा प्रयत्न आणि काही गंभीर आरोपांचा समावेश करण्याची शिफारस या एसआयटीने केली होती.