तळेगाव ढमढेरे (पुणे) – शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे मेन चौक प्रतिष्ठानने करोनाच्या पार्श्वभूमीवर भीमा नदीच्या घाटावर निर्माल्य जमा करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत गणेश भक्तांनी दोनशे किलो निर्माल्य जमा केले. या निर्माल्याचा खत निर्मितीसाठी उपयोग केला जाणार आहे.
विठ्ठलवाडी येथे एक गाव एक गणपती श्रीराम मंदिरामध्ये बसवण्यात आलेला होता. अनेक गणेशभक्तांनी घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना केलेली होती. विसर्जनावेळी भीमा नदीच्या पाण्याचे प्रदूषण होऊ नये म्हणून आणलेले निर्माल्य पाण्यात न टाकता बाजूला ठेवण्यात आले. मेन चौक प्रतिष्ठानच्या माध्यमातून व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गेल्या सहा वर्षापासून गणपती विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य संकलनाचा उपक्रम पी. बी. जगताप व प्राध्यापक संदीप गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जात आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश राऊत, घनश्याम गवारे, शामराव गवारे, पोलीस पाटील शरद लोखंडे दिलीप शेलार उपस्थित होते.