पुणे – अनंत चतुर्दशी आणि लक्ष्मी रस्ताचं अतूट नातं आहे. पण मंगळवारी एकाही मंडळाची मिरवणूक या रस्त्यावर आली नाही. त्यामुळे या रस्त्याला शब्दश: सुतकी रूप आलं होतं. एरवी गजबजणारा, फिरत्या विक्रेत्यांच्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या नव्हत्या. एरवी सुरू असणाऱ्या दुकानांचे शटर देखील ओढले होते. त्यामुळे वातावरणात कमालीचा नैराश्याचा सूर जाणवत होता. रस्त्यावर एकही वाहन नसलेला अन गर्दीचा लवलेश नसलेला लक्ष्मी रस्ता पाहणं खरंच क्लेशदायी आहे, ही एका ज्येष्ठ पुणेकराची भावना बोलकी होती.
दरवर्षी मिरवणुका म्हंटले की ढोलाचा ठोका, ताशाची तर्री, ध्वजाचा रूबाब आणि या सगळ्या आवाजावर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या नागरिकांनी धरलेला ठेका असेच चित्र असायचे. मात्र यंदा या रस्त्यावर फक्त शांतता आणि चार गाड्यांची वर्दळ दिसली. लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ होणाऱ्या मिरवणुकांचा उल्लेख केल्यानंतर, गणरायाच्या दर्शनासाठी आणि मिरवणुकीची भव्यता मनात टिपण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत उभे असणारे लाखो नागरिक ओघाने डोळ्यांसमोर येतात. याशिवाय पुण्याबाहेरून खास मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या व्यक्तींना नेहमीच पुण्यातील विसर्जन मिरवणुकींचा हेवा वाटतो.
पूर्वी सहकुटुंब दिवसभर मानाचे गणपती पाहायचे, रात्री जेवण करून, ज्येष्ठांकडे लहानग्यांना सोपावून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई, मंडई आदी मंडळाची सजावट आणि रोषणाई पाहणे, हा पेठांमधल्या पुणेकरांचा नेमच असायचा.
मंडईच्या चौकात महापौर गणरायाची आरती करतात आणि मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला सुरूवात होते. पुढे त्या मिरवणुका लक्ष्मी रस्त्यामार्गे टिळक चौकात (अलका टॉकिज चौक) जातात. या मार्गावरील स्थिर वादन, चित्तथरारक प्रात्यक्षिके, फुलांनी सजवलेले रथ, सामाजिक संदेश देणाऱ्या भव्य रांगोळ्या, नेत्रदीपक रोषणाई हे वातावरणच अवर्णनीय असते. मंडई चौकापासून टिळक चौकापर्यंत केलेली सैर डोळ्यांच्या कडा ओल्या करणारी होती.
यासगळ्या नेहमीच्या वातावरणाबरोबरच पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले नागरिक, परदेशी नागरिक, मिरवणुकांतील क्षण टिपणाऱ्या हात उंचावणारे कॅमेरामन, लहान मुलांना “बाप्पां’ना पाहता यावे यासाठी धडपडणारे पालक, मिरवणुका निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रयत्नशील असणारे पोलीस बांधव आणि त्यांनी केलेले “बॅरिकेडिंग’ या सगळ्याचीच यंदा उणीव जाणवली.