नवी दिल्ली – भारतात गेल्या 50 वर्षात ज्या उष्णतेच्या लाटा वेळोवेळी आल्या त्यात किमान 17 हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. देशातील हवामान तज्ज्ञांनी या संबंधात एक अहवाल प्रकाशित केला आहे त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
अर्थसायन्स मंत्रालयाचे सेक्रेटरी एम. राजीवन, वैज्ञानिक कमलजीत रे, एस. एस. रे, आर. के गिरी,आणि ए. पी. दिमरी यांनी हा अहवाल तयार केला आहे.
यात सन 1971 ते 2019 या अवधीतील उष्णतेच्या लाटेचा अभ्यास करण्यात आला आहे. या अवधीत संपुर्ण जगभरात एकूण 1 लाख 41 हजार 308 जण दगावले असून त्यातील 17 हजार 362 जण भारतातील आहेत. यात सर्वाधिक लोक आंध्रप्रदेशात दगावले आहेत.
त्या खालोखाल तेलंगणा आणि ओडिशा या राज्यातील लोक मोठ्या प्रमाणात दगावले आहेत. साधारण दरवर्षी मे महिन्यात उन्हाळ्याची तीव्रता ्अधिक असते. ज्या भागात या लाटेचा मोठा प्रभाव दिसून येतो त्या विभागात महाराष्ट्राचाही समावेश आहे.
सध्या अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये उष्णतेची मोठी लाट आली असून त्यात उत्तर अमेरिकेतील अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यंदा कॅनडात व्हॅंकुवर येथे सर्वाधिक म्हणजे 49 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले गेले आहे.
सर्वसामान्य तापमानापेक्षा जेव्हा जादाचे तापमान नोंदवले जाते त्यावेळी त्याला उष्णतेची लाट असे संबोधले जाते. जागतिक तापमान वाढीमुळे उष्णतेच्या लाटेचे प्रमाण सध्या वाढले आहे. हवेत मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन गॅस मिसळल्याने उष्णतेचे प्रमाण वाढते असेही यात नमूद करण्यात आले आहे.