काठमांडू – नेपाळच्या पश्चिम भागात गेल्या 24 तासांत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये किमान 17 जण ठार झाले आहेत. नेपाळमधील सुदूरपश्चिम प्रांतातील अच्छाम जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी या दरडी कोसळल्या आहेत.
या जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या विविध घटनांमध्ये किमान 17 जण ठार झाल्याची प्राथिमिक माहिती आहे, असे प्रभारी मुख्य जिल्हा अधिकारी दीपेश रिजल यांनी सांगितले. हा जिल्हा राजधानी काठमांडूपासून 450 किलोमीटर अंतरावर आहे.
भूस्खलनाच्या विविध घटनांमध्ये जखमी झालेल्या 11 जणांना हेलिकॉप्टरने सुर्खेत जिल्ह्यात हलवण्यात आले आहे. तर मातीच्या ढिगाऱ्याखाली तिघेजण दबले गेले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मदत आणि बचाव कार्यासाठी नेपाळचे पोलीस दल सक्रिय झाले आहे. भूस्खलनाच्या घटनेमुळे सात जिल्ह्यांना जोडणाऱ्या भिमदत्ता महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर अनेक ठिकाणी दूरसंचार सेवाही विस्कळीत झाली आहे. नेपाळच्या डोंगराळ भागात पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यातही जून ते सप्टेंबर दरम्यानच्या पावसाच्या दिवसात हे प्रमाण अधिक आहे.