मुंबई: मुंबईतील महत्वाच्या 16 पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. मुंबईतील पूल दुर्घटनांनंतर रेल्वे मार्गावरील सर्व पुलांचा सर्व्हे करण्यात आला होता. आयआयटी मुंबईच्या वतीने करण्यात आलेल्या मुंबईतील रेल्वे हद्दीतील पुलांची डागडुजी टप्प्या-टप्प्याने केली जात आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानंतर शहर भागातील एकूण 16 रेल्वे पुलांची डागडुजी करण्यात येणार आहे. यामध्ये दादरच्या टिळक पुलासह एलफिन्स्टन पूल, करीरोड, चिंचपोकळी, ग्रॅंटरोड आदी पुलांचा समावेश आहे. या पुलांवरील पृष्ठभागाची मास्टिक अस्फाल्टने डागडुजी केली जाणार आहे.
यासाठी महापालिकेने परिमंडळ एकमधील 8 पूल आणि परिमंडळ दोनमधील 8 पूल अशाप्रकारे एकूण 16 पुलांच्या कामांसाठी स्वतंत्र निविदा काढली होती. यासाठी अनुक्रमे 5.90 कोटी आणि 8.50 कोटी याप्रमाणे एकूण 14 कोटी 40 लाख रुपयांचे कंत्राट देण्यात येत आहे.