आरोग्यमंत्र्यांची माहिती
मुंबई: दिल्लीतील निजामुद्दीनच्या मरकजच्या कार्यक्रमाला राज्यातील 1400 लोक सहभागी झाले होते. यापैकी 1300 जणांना क्वारंटाईन करण्याचे काम सुरु आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चा केली. या चर्चेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषद घेतली आणि याबाबत माहिती दिली.
निजामुद्दीनला तबलिगी जमातचा 18 मार्चला जो कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमाला देशभरातून हजारो लोक गेली होती. आपल्याही राज्यातून जवळपास 1400 लोक गेली होती. प्रत्येक जिल्ह्यातील काही लोकं गेली होती. त्यापैकी 1300 लोकांना क्वारंटाईन करण्याचं काम सुरु आहे. त्यांचे ट्रेसिंग झालेले आहे. त्यांचं क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ते कुठे राहतात, त्यांची नावे समजली आहेत. सामाजिक संस्था, एनएसएसचे कार्यकर्ते, होमगार्ड यांच्या सर्वांच्या साहाय्याने त्यांना समजवून सांगण्याचं आणि क्वारंटाईन करण्याचं काम करायचं आहे, असे राजेश टोपे म्हणाले.
राज्य शासनाचे जीएसटीच्या संदर्भात आणि 14 वित्त आयोगाच्या संदर्भात 16,000 कोटी रुपये येणे आहे. ते आले तर त्याचा अधिक उपयोग होईल. लॉकडाऊनमुळे आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे जे काही येणं आहे ते द्यावे, अशी मागणी सर्व राज्यांनी केली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
रॅपीड टेस्टला मान्यता
राज्यात 5 हजार चाचणींची क्षमता आहे. आपल्याला रॅपीड टेस्टची मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे प्राथमिक चाचणीतच प्रादूर्भाव आहे का ते कळेल. तसेच ब्लड घेतल्यावर केवळ 5 मिनिटात करोना आहे की नाही असे समजणारी ही रॅपिड टेस्ट आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले. मोदींनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी आपण महाराष्ट्रात आता तर करतो आहोत. पण पुढे आणखीन चांगल्याप्रकारे करणार आहोत. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा विशेष म्हणजे टेस्टिंगचा. दर दिवसाला पाच हजार टेस्ट होऊ शकतात एवढी क्षमता राज्यभराची आहे. आपल्याला रॅपीड टेस्टची मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे प्राथमिक चाचणीतच प्रादूर्भाव आहे का ते कळेल, असे राजेश टोपे म्हणाले.