पुणे, दि. 18 – शहरात सोमवारी रात्री 9.45 ते 11.45 या अवघ्या दोन तासांत झालेल्या पावसाने 140 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. या दोन तासांत तब्बल 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाकडून सन 1882 नंतर शहरात झालेल्या पावसाच्या नोंदी ठेवण्यात आल्या असून, त्यात आतापर्यंत दोन तासांत कधीही एवढा पाऊस झाला नसल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या पावसाने महापालिका प्रशासनाची यंत्रणा हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. महापालिकेने शहरात पाण्याचा निचरा होण्यासाठी टाकलेल्या पावसाळी वाहिन्या तसेच ड्रेनेज वाहिन्यांची क्षमता 60 ते 65 मिमी पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता असून प्रत्यक्षात दोन तासांत दुप्पट पाऊस झाल्याने शहरातील पाषाण, औंध आणि सिंहगड रस्ता वगळता शहरातील सर्व रस्त्यांवर दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
सोमवारी रात्री झालेल्या पावसानंतर महापालिका आयुक्तांनी हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली. यावेळी 1990 नंतर पुण्यात पहिल्यांदाच दोन तासांत 105 मिमी पाऊस झाल्याची नोंद सोमवारच्या पावसाने झाली असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी पुण्यात 2010 मध्ये एकाच दिवशी 180 मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र हा पाऊस 24 तासांत झाला होता. मात्र, सोमवारचा पाऊस हा अवघ्या दोन तासांत झाल्याने ही अतिवृष्टी असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. आतापर्यंत गेल्या 30 वर्षांत ऑक्टोबर महिन्यात 440 मिमी, 316 मिमी पावसाची नोंद झाली असून, यावर्षी 20 ऑक्टोबरपर्यंत 264 मिमी झाला असून, गेल्या 140 वर्षांतील हा ऑक्टोबर महिन्यातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
शहरात 57 ठिकाणी पाणी शिरले
पावसाने शहरात 57 ठिकाणी पाणी घुसण्याच्या घटना घडल्या. येवलेवाडी स्मशानभूमीजवळ, सुखसागरनगर, अंबामाता मंदिर कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड, रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ, डॉल्फिन चौक, कवडे रोड अग्निशमन केंद्रासमोर, हडपसर गाडीतळ, शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम, कसबा पेठ, फिश मार्केटजवळ, कुंभारवाडा, नारायण पेठ, मोदी गणपती औंध, डिएव्ही स्कूल गल्ली, गणेश पेठ, कोरेगाव पार्क, परिसर, विश्रांतवाडी, नेहरू रस्ता, सदा आनंदनगर, भवानी पेठ, धोबी घाट, नाना पेठ, नगर रस्ता, विमाननगर, पुणे स्टेशन परिसर, वडगाव शेरी भागातील घरांमध्ये पाणी घुसले. भवानी पेठ परिसरात महापालिका आयुक्तांनी स्वत: चालत जाऊन पाहणी केली, तर अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी कोरेगाव पार्क, विश्रांतवाडी, विमाननगर भागात जाऊन पूरस्थितीची पाहणी केली.
12 जणांना वाचविले
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे 50 हून अधिक तक्रारी आल्या होत्या. त्यातील 57 ठिकाणी पाणी घुसले होते. त्यात, 18 ठिकाणी घरांमध्ये, तर उर्वरीत ठिकाणी इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी घुसले होते. कोंढवा खुर्द भाजी मंडई येथील एका घरात 7 जण अडकले होते. तसेच मंगळवार पेठ येथील सदा आनंदनगर येथे पाच जण आडकले होते. त्यात तीन लहान मुली आणि दोन मुलांचा समावेश होता. या सर्वांना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले.
सोमवारी झालेल्या पावसाचा फटका रेल्वे विभागाला देखील बसला आहे. पुणे रेल्वे स्थानकात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. दिवाळी सुटीनिमित्त नागरिकांनी गावाकडे जाण्यासाठी गर्दी केली होती. पण अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे स्थानकासमोरील मोकळ्या जागेला तलावाचे स्वरूप आले होते. तर तिकीट घरात दोन ते तीन फूट पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना तिकीट काढण्यासाठी गुडघाभर पाण्यात उभे राहावे लागत होते. तर रेल्वे स्थानकात येण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या भुयारी मार्गात पाच ते सात फूट पाणी साचल्यामुळे हा मार्ग काही काळ बंद होता. भुयारी मार्गातील अनेक दुकानात पाणी शिरल्यामुळे विक्रेत्यांचे नुकसान झाले आहे.
शिवाजीनगर न्यायालयात पाणी
शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात ठिकठिकाणी पाणी साचले होते. विशेषत: वकील पार्किंग करत असलेल्या ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. त्यामुळे वकिलांना गाडी लावताना कसरत करावी लागली. न्यायालयाच्या चार क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ चिखल झाला होता.
नुकसानीचे पंचनामे सुरू
शहरात दोन ठिकाणी घरांच्या भिंत पडल्याची घटना घडली आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभाग व पालिका प्रशासनाकडून सुरु आहे. दरम्यान, या पावसामुळे कोणत्याही कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले नसल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.
शहरात सोमवारी झालेला पाऊस विक्रमी होता. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जवळपास शहरात सर्वत्र पाणी होते. त्यावर, उपाययोजनांसाठी महापालिकेची यंत्रणा रात्रभर कार्यरत होती. या पावसामुळे शहरातील पावसाळी वाहिन्यांची क्षमता वाढविणे आवश्यक बनले असून, यासोबतच पाणी साठण्यामागे कचरा, चुकीच्या पद्धतीने झालेली बांधकामे, मेट्रोच्या कामामुळे अनेक भागात पाणी वाहण्यास निर्माण झालेले अडथळे, तसेच सोसायट्यांच्या पार्किंगच्या उंचीपेक्षा रस्त्यांची उंची जास्त असल्याने निर्माण झालेले लो लाईन एरिया ही कारणे असून, त्यावर तातडीने उपाययोजना केल्या जाणार आहेत. -विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका