मंचर-चांडोली बुद्रुक -वेताळमळा येथील 10 शेतकऱ्यांच्या 14 एकर क्षेत्रातील ऊस जळाल्यामुळे नऊ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. भीमाशंकर कारखान्याच्या ऊस तोडणी मजुरांनी तातडीने धाव घेत मदत केल्याने बारा एकर क्षेत्रातील ऊस वाचविण्यात यश आले आहे.
बुधवारी (दि. 15) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांच्या शेतातील उसाला आग लागली. सुरुवातीला अशोक हरिभाऊ थोरात यांच्या उसाला आग लागली. त्यानंतर आग भडकून गोविंद थोरात, तुकाराम थोरात, दत्तात्रय थोरात, रमण थोरात, संजय थोरात, जयदीप थोरात या शेतकऱ्यांच्या उसाला आग लागली.
शेतकऱ्यांनी विहीरीवरील विद्युत मोटार सुरु करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीची तीव्रता व झळा अधिक असल्याने शेतकऱ्यांना 14 एकर क्षेत्रातील ऊस वाचवता आला नाही. त्यामुळे दहा शेतकऱ्यांचा ऊस जळून गेला आहे. या परिसरात ऊस तोडणी सुरू असताना अनेक ऊसतोडणी कामगार शेतकऱ्यांच्या मदतीला धावल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळण्यापासून वाचला आहे.