बेंगळुरू – कर्नाटकातील भाजपचे ज्येष्ठ नेते व विद्यमान लोकसभा सदस्य सदानंद गौडा यांनी काल राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की आपण निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी त्यांनी भाजप पक्षाच्या निर्णयावर जाहीर नाराजीही व्यक्त केली होती.
जेडीएस बरोबर युती करण्याचा निर्णय भाजपश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना विश्वासात न घेता परस्पर घेतला असल्याची टीकाहीं त्यांनी केली होती. तथापि त्यांच्या या निर्णयावर भाजप संसदीय मंडळाचे सदस्य बी एस येडियुरप्पा यांनी सारवासारव केली आहे. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे की भाजप श्रेष्ठींनी सदानंद गौडा यांना यावेळी लोकसभा निवडणूक न लढवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेतला आहे. माझ्यासह पक्षाच्या 13 खासदारांना पक्षाने यावेळी निवडणुकीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे असेही येडियुरप्पांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री असलेले सदानंद गौडा सध्या बंगलोर उत्तरमधून लोकसभेचे सदस्य आहेत. हायकमांडकडून “दुर्लक्ष” झाल्यामुळे गौडा यांनी हा निर्णय घेतला आहे का, असे विचारले असता येडियुरप्पा म्हणाले, की त्यांना (गौडा) यावेळी निवडणूक न लढवण्याचे थेट सांगण्यात आले आहे. त्यांना पक्षाने खूप काही दिले आहे आणि ते स्वत: गौडा यांनी मान्य केले आहे. तरूण नेतृत्वाला वाव देण्यासाठी आपण दूर झालो आहोत असेही सदानंद गौडा यांनी म्हटले असल्याकडेही येडियुरप्पा यांनी लक्ष वेधले.