– बाबासाहेब सौदागर
प्रवरामाईच्या परिसरात मी आलो की मला माझ्या बालपणीच्या आठवणी मनात दरवळू लागतात. उन्हाळ्यात रात्री चांदण्यात झोपलो की माझी आजी शहाई लयदार गोष्टी सांगायची. वेगवेगळ्या लयीत “ओव्या’ ऐकवायची. दुष्काळाचं वर्णन असलेल्या खूप ओव्या ऐकलेल्या आहेत.
नयी पडला पाऊस
झाली नयी आबादाणी..
ठाक कोरडी पेहरा
नयी वाहीलं ग पाणी..
खिऱ्या काकड्याच्या वाड्या
गेल्या ऊन्हानं जळुन..
पोटी पिकण्या आधीचं
गेलं भुईचं या न्हान..
किंवा नैतिकता शिकविणारी ओवी ही असायची…
आब्रुदार मराठ्यांच्या
आम्ही साऱ्या लेकीसुना..
परक्या गं पुरुषाला
मागु नयी कातचुना..
अशा तिने रचलेल्या काही कविताही असायच्या. त्यात ओतपोत भरलेला निसर्ग असायचा. तो डोळ्यांपुढे चित्रमय होऊन यायचा.
रानरुयीच्या लेकीला
मवु पंख रेषमाचे..
उन्हाळ्यात वाऱ्यासंगे
बीज रानोमाळ नाचे..
अशा कितीतरी ओव्या लोककथा ती ऐकवायची. मला तर या अनेक ओव्या आजही जशाच्या तशा पाठ आहेत. तिच्या बरोबर ओढ्याच्या काठावर गायी, गुरं, शेळ्या चारताना निसर्ग वाचन शिकलो. तोच निसर्ग ते सौंदर्य आजही माझ्या कवितेतून चित्रमय होऊन येते आहे. तिसरीला शाळेत असताना मराठीच्या पुस्तकातील कविता कळू लागल्या. कवी ग. ल. ठोकळ, बहिणाबाई चौधरी, ग. दि. माडगुळकर, ग. ह. पाटील यांच्या कविता रानावनात सोबत करू लागल्या. पुढे सातवीला असताना आजीच्या आठवणींचा वि. द. घाटे यांचा ललित लेख पाठ्यपुस्तकात होता. तो वाचताना डोळे भरून यायचे. शेताशिवारात बालपण गेलं.
वडील सालगड्याप्रमाणे शेतीमास्तर म्हणून काम करायचे. शेतमळ्यातच रहायचो. ऊन, वारा पाऊस थंडी पांघरीत शाळेत जायचो. सोनगावचा परिसर सोडून पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला ते गाव पाचेगाव. सगळं गाव रजपुत कऱ्हेकरांचं गाव. या समाजातील पुरुष झोळदार दोनटांगी धोतर वर तीन गुंड्याचा पांढरा शर्ट वापरायचे, तर बाया पायघोळ नेहमीच्या नव्वार काठपदराचे लुगडे, गळाभर सोन्याच्या दागिन्यांनी फार सुंदर दिसायच्या. आमची आई मराठ्यांच्या बायासारखी राहायची. तिचं चौथीपर्यंत शिक्षण झालेलं, तिला शाळा मास्तरीण व्हायचं होत;ं पण नशिबाने शेती मास्तरची बायको “मास्तरीणबाई’ झाली. घरात पुस्तक वाचन वगैरे प्रकार नव्हता. पण तिने माहेरच्या लोकांनी मला रेडिओ घेऊन दिला, असं सांगून तिने एक मर्फी कंपनीचा मोठा लायसनचा रेडिओ विकत आणला होता. सकाळी स्टेशन सुरू होण्यापूर्वी ती रेडिओ सुरू करायची. मंगलधून संपली की भक्ती गीते सुरू व्हायची. ते मी खूप लक्षपूर्वक ऐकत होतो.
गाणे ऐकणे माझा जिव्हाळ्याचा छंद होता. कुठल्या गाण्याला काय म्हणतात तसेच गीतकार, संगीतकार, गायक हे सर्व चांगले कळू लागले होते. वडील फारच तापट, कडक स्वभावाचे होते. शेती मालकांचे ते फार हित पाहायचे. त्यांच्या मताशी ठाम असायचे. मालकांबरोबर भांडणं झालं की काम सोडून दुसऱ्या शेती खात्यावर कामाला जायचे. असचं भगीरथ महालेंच्या बरोबर झाले. ते काम सोडून निघताना त्यांनी तो रेडिओ तिथल्या लोकांना देऊन टाकला. हा प्रकार आम्हाला कळालाच नाही. रात्री बैलगाडीमध्ये बिऱ्हाड भरून आम्ही वडाळा महादेव येथील के. पी. भालेराव यांच्या शेतात राहायला आलो. अतिशय सुंदर शेतमळा पेरू, अंजीर, आंब्याच्या बागा तिथे होत्या. तिथल्या निसर्गाच्या सान्निध्यात मी फार सुखावलो.दादांनी रेडिओ तिथेच दिला म्हणून मी आणि आई खूप चिडलो. आई नेहमी म्हणायची, तुझा बाप लोकधार्जिण्या आहे. कुणी मागितले तर अंगावरचे कपडे देईल.
या शेततळ्यात उंबर, पिंपळला पार बांधलेला होता. मागे सुंदर पर्ण कुटी होती. तिथे सुट्टीत मालक लोक आले तर ग्रामोफोन लावायचे. त्या तबकड्यांवर धार्मिक गाणी आणि नाट्यगीते असायचे. सर्व सुसंस्कृत ब्राह्मण मंडळी फार कलासक्त होती. ती गाणी ऐकायला दिवसभर तिथे घोटाळत राहायचो. आत मध्ये खूप पुस्तक होती; पण त्यांचे देशपांडे नावाचे नातेवाईक सोवळ्या ओवळ्यातील होते. मला शिवाशिव करू देत नव्हते. मला राग यायचा. अरे, मी मराठ्यांच्या आहे.
तरी हे असं वाईट वाटायचं. एकदा अतिशय देखणे रमेश भालेराव नावाचे मालक शेतावर आले. मला ग्रामोफोनच्या तबकड्या आणि पुस्तक पाहायला त्यांनी परवानगी दिली. गीतरामायणच्या तबकड्या त्यावर ग. दि. माडगुळकर यांचे नाव पाहून मला वाटले, ना. घ. देशपांडे आणि माडगूळकर यांच्यासारखे आपलेही नाव गाण्यावर यावे. काही दिवसांनी पुन्हा आम्ही पाचेगावला शेती खात्यावर राहायला गेलो. दर मंगळवारी आठवडे बाजारात रात्री चित्रपट किंवा तमाशा यायचा. ज्या दिवशी चित्रपट आहे त्या दिवशी अर्धा दिवस आईला शेतात काम करू लागायचो. दोन रुपयांची लाल नोट मिळायची. आई बरोबर मळ्यातील इतर बायांसह आम्ही चित्रपट पाहायला जायचो.पडद्यावर गीतकार पटकथा संवाद लेखक हे नाव पहायचो. मला वाटायचं असं संपूर्ण पडदा भरून “बाबासाहेब सौदागर’ हे नाव यावं. या कालावधीमध्ये मी तमाशाप्रधान चित्रपट खूप पाहिले. त्या धुंदीचं “नव्हाळीतलं निळं चांदणं’ मनात दरवळत राहायचं.
आता काहीही करून रेडिओ घ्यायचा होता. पण एवढ्या गरिबीत कोण रेडिओ घ्यायला परवानगी देणार.
रात्री एकतारी वर कथा काव्य सादर करणारे शिरसगाववरून एक महाराज यायचे. त्यांचा चौरंग मी फुलांनी सजवून ठेवायचो. रात्रभर ते “निळावंती’नलदमयंती पांडवप्रताप, रामायणपासून क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कथा काव्य ऐकवायचे. आषाढात भिलांच्या वह्या, पोतराजाची गाणी, जागरण गोंधळाची गाणी ऐकायचो. वडील झोपलेले असताना मोठ्या माणसांच्या बरोबर तमाशा पाहायला जायचो. त्यातील कथा आणि काव्य खूप लक्षपूर्वक ऐकायचो. आठवीला असताना बऱ्यापैकी कथा, कविता लिहू लागलो होतो. वाकडीला वडाच्या झाडाखाली झोपडी बांधून तिथे वडिलांनी चहा, भेळ, भज्याचे हॉटेल टाकले होते.
मिळेल ती मराठी रद्दी मी राधाकिसन तेल्याच्या दुकानातून घेऊन यायचो. मराठी रद्दीचा कागद हलका असतो म्हणून दादा चिडायचे. मी पुस्तक वाचताना पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जायची. मी सारखं वाचतो म्हणून एकदा चहा का उतू जाऊ दिला म्हणून गिऱ्हाईकासमोर तोंडातून रक्त येईपर्यंत मारले होते. मला वाचू दिले नाही तर मी जीव देईल, अशी मी धमकी दिली होती. आईने वडिलांना समजावून सांगितले. तरी ते ऐकत नव्हते. मी दहावीला गेलो. वर्गातील धन दांडगे मुलं सोन्याच्या अंगठ्या, घड्याळ, चांगले भारी कपडे घालून यायचे. मुलींवर इम्प्रेशन मारायचे. मला तर पायाला चप्पलही नसायची. एकच रफ्फू केलेली फाटकी इजार, फाटका शर्ट, गबाळा अवतार… डोक्यावर कपबशांची बादली, चहाची किटली घेऊन शाळेच्या शिक्षकांना चहा द्यायला जायचो. वर्गात आल्यावर मुलं-मुली हसायचे. मुलींचे चेहरे न्याहाळत मी आनंद घेतला नाही. सगळा जीव गाणे ऐकण्यासाठी तळमळायचा. आमच्या घराच्या समोर न्हाव्याचे सलून दुकान होते. मराठी गाणे लागायच्या वेळेला मी गाणे ऐकायला दुकानात जाऊन बसायचो नाही, तर जवळ उभा राहून गाणे ऐकायचो. त्याच्या हे लक्षात आल्यावर तो मला पाहून रेडिओ बंद करून टाकायचा. फार वाईट वाटायचे. गिऱ्हाईकाला माझ्याकडे बोट करून काही तरी बोलून ते हसायचे. आमच्या हॉटेलमधील गल्ल्यातून चार-पाच रुपये चोरून बाजूला ठेवायला लागलो. मला जुना रेडिओ घ्यायचा होता. दादांच्या लक्षात आल्यावर गल्ल्याला त्यांनी कुलूप लावायला सुरुवात केली. मी सुट्टीच्या दिवशी कामाला जाऊ लागलो. एक जुना रेडिओ घेतला. पण खूप शिव्या खाव्या लागल्या.
गीतकार, लेखक व्हायचं स्वप्न. घरातील भाऊ बहीण सर्व मला हसायचे. तेव्हापासून मला वाटतं मी सांस्कृतिक मागासलेल्या जातीत का जन्माला आलो. वडील म्हणायचे, हे लिहिणं वाचणं हे ब्राह्मणी चाळे बंद कर. तू लिहिलेले किराणा दुकानदाराला दे. तो तुला किराणा धान्य देतो का बघ. सगळे हसायचे.
मला चित्रपटात गाणे लिहायला मिळावेत म्हणून मी कितीतरी मूर्ख आणि विद्वान समजणाऱ्या लोकांना भेटलो. कोल्हापूरला घरातील सर्व पितळी भांडी अर्ध्या किमतीत विकून भेटलो. एकही दरवाजा उघडला गेला नाही.
दैनिकात कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. शशिकांत शिंदे शिर्डीला राहायचा. छान गेय कविता लिहीत होता. त्याचे एक दिवस पत्र आले. डॉ. सतीश मेहतांकडे कोपरगावला कविसंमेलन आहे. या. मी गेलो. मोठ्या कवींच्या कविता ऐकल्या. मध्यरात्रीपर्यंत ते दारू प्यायला गेल्यावर आम्ही नवोदित कवींनी कविता ऐकवल्या. खूप सुखद अनुभव वाटला.
“शब्दालय’ प्रकाशनाच्या सुमतीताई लांडे यांच्या घरी जायचो. त्यांच्या आईबरोबर ओव्या गायचो. ताईने मधुकर देशमुख यांना सांगून मला तात्पुरती नोकरी दिली. श्रीकृष्ण राऊत, लक्ष्मीकांत घुमे, शशिकांत शिंदे, पोपट सातपुते यांच्या कवितासंग्रहासोबत माझा “सांजगंध’ कवितासंग्रह प्रकाशित केला. वेगाने कविता लेखन सुरू झाले. या पुस्तकाला बरेच नामवंत पुरस्कार मिळाले. आकाशवाणी केंद्रप्रमुख लियाकत अली सैय्यद यांनी आकाशवाणीवर मुलाखतीसाठी बोलविले. कविता गायन अतिशय अप्रतिम झाले. माझ्या मनात कोंडलेल्या सांस्कृतिक आणि सामाजिक दु:खाला वाट मोकळी झाली. साहेब घरी जेवायला घेऊन गेले. मी हात धुताना त्यांनी हातावर पाणी टाकले. माझ्या हातावर रक्त आणि फोड त्यांनी पाहिले. मी मुळा प्रवरा वीज संस्थेमध्ये पोल रोवण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम करतो हे ऐकून ते चिडले. मुक्त विद्यापीठाद्वारे मी बी.ए केले. कार्यालयात टेबल खुर्चीवर काम मिळाले. पाच-सहा वर्षे भयानक जगलो. भाऊ शिक्षण घेत होते. भयाण लढा. याच कालखंडात जीवन किर्लोस्कर नावाच्या संपादकांच्या कार्यक्रमात मी आईच्या कविता गाताना “माई’ तथा सिंधुताई सपकाळ भेटली. मी तिचा पहिला साहित्य सोपान माणसपुत्र म्हणून तिने जाहीर केले.
दु:ख दु:खाच्या गळ्यात पडून रडले. भेटायला आली की माझ्या गळक्या फाटक्या घरांत ती थांबली. एकत्र भाजीभाकरी खाल्ली. तिने मला आत्मविश्वास दिला. आत्महत्या करू दिली नाही. मृत्यूला कवटाळून मी मागे आलो. दरवेळी माई मला चित्रपट पटकथा संवाद लेखक प्रतापदादा गंगावणे यांच्याबद्दल काहीतरी नवं नवं सांगायची. मला या प्रतिभावंत लेखकाला भेटायचे होते. योग येत नव्हता.
मी श्रीरामपूरला ज्येष्ठ तमाशा कलावंत लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांना येऊन भेटायचो. डॉ. जब्बार पटेल यांच्याबरोबर त्या मधु कांबीकर एक चित्रपट करत होत्या. “मला गीतलेखन द्या’, हे माझे म्हणणे खूप भाबडेपणाचे होते. इथली दुनिया किती भयाण आहे हे मला कळू लागलं होतं.
एक दिवस लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांनी माझी परीक्षा घ्यायची ठरवले.
त्यांनी कविवर्य ना. धों. महानोर यांची “भरलं आभाळ… पावसाळी पाहुणा गं..श्रावणाचं ऊन मला झेपेना’ ही कविता ऐकवली. मी म्हटलं, “”बाई, ही निसर्ग कविता.. दोन कविता.. एकाच मीटरच्या एकत्रित केल्यात. ही लावणी कशी काय?” त्या म्हणाल्या, “”जब्बार पटेल कवितेची लावणी करतात. मोठी माणसं आहेत.” मी नमस्कार केला.
त्या मला म्हणाल्या, “”मला एका संगीत नाटकासाठी उद्या मुंबईला जायचं आहे. महाराष्ट्रातील बायका जेवढे अलंकार वापरतात त्यांचं वर्णन असलेली नऊ ओळींची लावणी लिहून द्या.” मी विचारले “कधी देऊ?’ त्या मला म्हणाल्या, “लगेच देता का दहा-पंधरा मिनिटांत?’
मी होकार दिला. त्या म्हणाल्या, तिने निळा शालू घातला आहे. चंद्राचा मणी तिने गळ्यात घातला आहे. अशा वेळी शृंगाराचा रंग खेळायला ती त्या सरदाराला रंगमहालात बोलविते आहे, हे त्या लावणीत यायला पाहिजे. त्यांच्याच बैठकीत बसून मी दहा मिनिटांत सर्व अलंकारांची ही लावणी लिहून दिली-
रात नेसली शालु निळसर
कंठी घातला चंद्रमणी..श्र
शृंगाराचे रंग लुटाया
रंग महाली या हो धनी… श्रश्र धृश्रश्र
वजरटिकेला लख्ख चांदणं
रत्न मोत्यांची माळ झुले…
चांदीच्या या चित्तांगाला
राजवर्खी ग पाच फुले..
कमरपट्ट्याने मिठी घातली
चमचम करते हिरकणी..श्रश्र
हिमरंगाचे जोडे तोढे
हसती जरीच्या काठाला…
महाल दिव्यांचा रंग लाभला
माझ्या बांधीव घाटाला…
गगनजाईचा गंध दरवळे
मंथर रात्री माझ्या मनी…श्रश्र
नक्षत्रांची नथ घातली
सर्जा रुपेरी थरथरतो…
तुम्ही राजसा पुतळ्या चढविता
काटा अंगावर सरसरतो…
गोठ पाटल्या किणकिण करती
देहाची या जळते धुणी…श्रश्र
ही लावणी वाचून ऐकून लक्ष्मीबाई खूप खूश झाल्या. मला भरभरून आशीर्वाद दिले.
कोल्हापूरचे प्रतिभावंत दिग्दर्शक यशवंत भालकर दिग्दर्शित “सत्ताधीश’ चित्रपटाचे सर्व गाणे ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिली होती. अनेकदा माझ्या नावाची शिफारस प्रताप गंगावणे यांनी केली होती; पण माझ्यासारख्या नवोदित गीतकाराला कोण संधी देणार?
याच दरम्यान “लेखक आपल्या भेटीला’ या मुंबई दूरदर्शनच्या कार्यक्रमात माझी दीर्घ मुलाखत प्रक्षेपित झाली होती. ती मुलाखत यशवंत भालकर तथा भाऊ यांनी पाहिली होती. प्रभावित होऊन मला या चित्रपटात एक अभंग लिहायची संधी दिली. गाणे लिहिता आले नाही तर मानधन आणि प्रवास भाडेसुद्धा देणार नाही, असं ते बोलले होते. कोल्हापूरला जायचं तर प्रवासभाडे भरायला जवळ पैसे नाहीत. मकरसंक्रांत होती. बायकोच्या गळ्यातले एकुलते एक डोरले तोडून सोनाराकडे मोडले. घर, किराणा खर्च धान्य, याकरिता सर्व पैसे तिला देऊन जाणं होईल एवढे पैसे घेऊन बाहेर पडलो.
कोल्हापूर गेलो तर एक प्राध्यापक कवी गीतकार भेटला. तो म्हटला, “बाबासाहेब माघारी जा. जगदीश खेबुडकर यांनी एकाही गीतकाराला मोठं होऊ दिलं नाही. ते भयानक अपमान करतात. लोकांसमोर आपलं गाणं फाडून तोंडावर फेकतात. शहाणे असाल तर माघारी जा.’ मी खूप भांबावून गेलो. दुसऱ्या दिवशी गीत लेखन. जगदीश खेबुडकर यांनी मला पायाही पडू दिले नाही. प्रसंग समजावून घेतला. अवघ्या दहा मिनिटांत आजीच्या ओवी मीटरमध्ये गाणे लिहून आणले. यशवंत भालकरांकडे गाणे देऊ लागलो, तर ते म्हणाले नानांच्या हातात द्या. मला दरदरून घाम फुटला. नाना तथा जगदीश खेबुडकर यांनी गाणे वाचले. जाम खूश झाले. गाणं महालक्ष्मीच्या मूर्ती समोर ठेवून देवी पुढील ओंजळीत फुले घेऊन माझ्या ओंजळीत फुले टाकली आणि यशवंत भालकर यांना म्हणाले, “यसबा.. अरे मला माझ्या गादीचा वारसदार मिळाला..दे या पोराला गाणे लिहायला. समुद्राच्या तळाशी जाऊन मोती वेचून आणणारा कवी आहे हा. ‘मला त्यांनी गळाभेट देऊन आशीर्वाद दिले.
गोकुळाष्टमीला माझा वाढदिवशी सायंकाळी हे गाणे सुरेश वाडकर यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाले. या गाण्यात डॉ. शरद भुथाडिया यांच्यासोबत मी भजनी मंडळ प्रमुखांची भूमिका केली. हर्मोनियम वाजवायला मला बसवून माझ्या चेहऱ्यावर पहिला मेकअपचा रंग लागला. प्रवास वेगाने सुरू झाला. आशा भोसले, उत्तरा केळकर, देवकी पंडित, अनुराधा पौडवाल, रवींद्र साठे, कैलाश खेर, रुपकुंवर राठोड, साधना सरगम, शान, शंकर महादेवन, वैशाली माडे अनेक दिग्गज गायक, गायिका यांनी मी लिहिलेल्या गीतांना स्वर दिला. मी अनेक चित्रपटांच्या कथा, पटकथा, संवाद गीते लिहिली. भूमिकाही केल्या. विविध वाहिन्यांवरून दररोज चित्रपट सुरू असतात. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी दूरदर्शन केंद्रावर गाणी प्रसारित होत असतात. सगळा भूतकाळ उभा राहतो. ज्या गोष्टीची ओढ होती तो “रेडिओ’ आणि “पुस्तक’ मी उशाला घेऊन गाणी ऐकत “नव्हाळीतलं निळं चांदणं’ अनुभवत असतो.