किल्ले शिवनेरी, लेण्याद्रीसह विविध गुंफांमध्ये 19ऐवजी केवळ 6 कर्मचारी
जुन्नर- महाराष्ट्रातातील पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली असून 121 जणांना नाराळ देण्यात आले आहे.
या अस्थायी कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण 10 किंवा अधिक वर्षांपासून या विभागात कार्यरत आहेत. मुंबई सर्कलच्या अंतर्गत येणाऱ्या वसई, एलिफंटा केव्हस, रायगड, जुन्नर, पुणे, सोलापूर, अलिबाग, जंजिरा, कोल्हापूर, विजयदुर्ग, मुंबई आदी विभागातील कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आल्याचे आदेश पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ. राजेंद्र यादव यांनी प्रसिद्ध केले आहेत. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण देण्यात आले आहे. त्यामुळे करोना संकटासोबत आणखी एक संकट या कर्माचाऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.
- जुन्नर विभागात आता केवळ सहा कर्मचारी-
जुन्नर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी, अष्टविनायकापैकी लेण्याद्री मंदिर, सातवाहन काळातील नाणेघाट, देशात सर्वाधिक संख्या असलेल्या 6 लेणी शृंखलेतील 250 गुफा आदी महत्त्वाच्या स्थळासोबत हापशी घुंबज, दरगाह, दिलावरखान मस्जिद व समाधी आदी 9 स्थळांचा समावेश होतो. या ठिकाणी सध्या 19 कर्मचारी कार्यरत असून येत्या 1 मे पासून केवळ 6 कर्मचारी काम करणार आहेत. जुन्नर विभागात मागील वर्षी 27 कर्मचारी कार्यरत होते, त्यांपैकी 8 कर्मचाऱ्यांची मागील नोव्हेंबरमध्ये कपात करण्यात आली होती. उर्वरित 19 कर्मचाऱ्यांचे गेल्या सप्टेंबरपासून पगारही झाले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. किल्ले शिवनेरीवरील विविध विकासकामे, सफाई व देखरेख करण्याचे सोडून या विभागाने काढलेल्या या आदेशाबाबत निसर्गप्रेमी जनतेतून रोष व्यक्त होत आहे. तसेच लेण्याद्री येथे लाखोंचे दर्शनशुल्क आकारले जात असून या पद्धतीने कपात केल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जुन्नरमध्ये 19 पैकी 13 जणांना घरी बसवण्यात आले असून महाराष्ट्रातील इतर ठिकाणी झालेल्या कपातीच्या तुलनेत ही कपात सर्वाधिक आहे. - शिवाजीराव आढळराव यांचे पंतप्रधानांना पत्र
केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यात भारतीय पुरातत्व विभागाअंतर्गत काम करीत असलेल्या 121 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचा निर्णय अतिशय निंदनीय असल्याची टीका माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केली आहे. त्यांनी याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारत सरकारचे सांस्कृतिक व पर्यटन मंत्री प्रहलाद सिंग पटेल व भारतीय पुरातत्व विभागाच्या महानिर्देशक श्रीमती उषा शर्मा यांना पत्रव्यवहार करून महाराष्ट्रातील पुरातत्व व ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संवर्धनाचे कार्य करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी केली आहे. जुन्नर तालुक्यातील महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी हे अखंड महाराष्ट्राचे आदरस्थान असून दरवर्षी या ठिकाणी लाखो शिवप्रेमी येत असतात. तसेच लेण्याद्री येथील गिरिजात्मजाच्या दर्शनाला मोठी गर्दी होत असते. या दोन्ही महत्वाच्या ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांना या कपातीमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना या विभागाने पुन्हा रुजू करून घ्यावे, अशा आशयाचे ट्विट आढळरावांनी केले आहे.