मुख्यमंत्र्यांनी याबाबत घेतली होती बैठक; मात्र त्यावर कोणतीही कारवाई नाही, केवळ कारवाईचा फार्स
कोल्हापूर (प्रतिनिधी) – शिरोळ येथील पंचगंगा नदीला रसायन व मळी मिश्रीत पाणी आल्याने हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. दुषित, दुर्गंधीयुक्त प्रदुषित पाण्याची तिव्रता कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागाने रुई व तेरवाड बंधाऱ्यातून स्वच्छ पाणी शिरोळ बंधाऱ्यात सोडण्याची शक्कल लढवली आहे.
बंधाऱ्यात दुषित पाणी आले कुठून याचा शोध घेवून संबधीतावर कारवाई करण्याच्या ऐवजी पाणी नदी पत्रात सोडून पाणी प्रदुषित करणाऱ्या घटकांना वाचवण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभाग करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान पंचगंगा नदी काठावरील सहा साखर कारखान्यांचे मळी मिश्रीत दुषित पाणी नदी पात्रात सोडल्याचा आरोप आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे.
तेरवाड बंधाऱ्यापासून ते शिरोळ बंधाऱ्याच्या दरम्यान पंचगंगा नदी पत्रात मोठ्या प्रमाणात रसायन युक्त दुषित पाणी सोडण्यात आले आहे.परिणामी पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होण्या बरोबर पाणी विषारी बनल्याने माशांचा मृत्यू होत आहे.
बंधाऱ्याच्या पश्चिम दिशेच्या पात्रात मृत माशाचा खच निर्माण झाला आहे. पाण्याला दुर्गंधी येत असून रसायन युक्त काळ्या रंगाचे पाणी पिण्यास व वापरण्यास धोकादायक बनले असून नागरी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.