-माधुरी तळवलकर
“शुभ बोल नाऱ्या’ ही म्हण कशावरून पडली माहितेय ना? लग्नकार्यात अनेक प्रकारची कामे करणाऱ्या माणसाचं नाव समजा नारायण आहे. तर हा नारायण सहज म्हणून जातो, “मांडवाला आग लागली तर?’ आता विवाहासारख्या मंगलप्रसंगी एखादा माणूस असं म्हणाला, तर ऐकणारा धसकतोच ना… त्याला ती अशुभ कल्पनाही नकोशी वाटते. तो म्हणतो, “शुभ बोल नाऱ्या…’
आपणही हा सल्ला लक्षात ठेवायला हवा. इतरांशी बोलतानाच नव्हे तर स्वतःशी बोलतानाही असले नकारार्थी विचार मनात येणार नाहीत अशी काळजी घ्यायला हवी. यासाठी जाणीवपूर्वक सकारात्मक, शुभंकर विचार मनात वाढवायला हवेत. काहीजण वाक्य उच्चारायचा अवकाश की, ते कसे शक्य नाही; हे ताबडतोब सांगतात. अमुक एक गोष्ट विकत आणायचीय; हे म्हणणार, दुकान बंद असणार. आपण खरेदीला बाहेर पडतोय; हे म्हणणार, पाऊस येणार नक्की. घरी यायला कुणाला उशीर झाला; हे म्हणतात, “अपघात तर नसेल ना झाला तिला?’
आपल्याला जर एखादे काम सिद्धीस न्यायचे असेल तर आधी ते काम खरेच मनापासून करायचेय का, हे एकदा नीट तपासून पाहा. एकदा ती गोष्ट करायचीच आहे, असे ठरल्यावर मग त्यातल्या अनुकूल बाबी कोणत्या आहेत त्या आधी पाहायला हव्यात. मग कार्यसिद्धीत कोणते अडथळे येण्याची शक्यता आहे यांचाही अंदाज घ्यायला हवाच. अडथळे लक्षात आल्यावर ते दूर कसे करता येतील त्याची आधीपासून तयारी करायला हवी. अशी जय्यत तयारी केली, तर हे काम का नाही होणार? पण तुम्ही आधीपासूनच नन्नाचा पाढा लावलात तर? त्याऐवजी “मी हे करीन, होईल.’ असेच म्हणायला हवे.
एकदा एक शिकारी वाघाची शिकार करायला बंदूक घेऊन निघाला. त्याचा मित्र म्हणाला, “गोळी घालायच्या आधीच तुझ्या अंगावर वाघ आला तर?’ तो म्हणाला, “मी झाडावर चढेन ना लगेच…’ मित्र म्हणाला, “वाघपण झाडावर आला तर?’ याने उत्तर दिले, “तोपर्यंत मी बंदूक नक्की रोखू शकेन.’ आपले नकारार्थी मित्र त्याला म्हणाले, “पण त्यानं जर तुझी गोळी चुकवली तर?’ शेवटी तो शिकारी आपल्या मित्राला म्हणाला, “तू कोणाच्या बाजूचा आहेस? माझ्या की वाघाच्या?’
तसे आपणही आपल्या मनाला विचारायला हवे, “तू कोणाच्या बाजूने आहेस? आशेच्या की निराशेच्या? यशाच्या की अपयशाच्या?’ आपण जर आशेच्या बाजूने विचार केला, यश कसे मिळेल यावरच लक्ष केंद्रित केले, मधे येणाऱ्या अडथळ्यांचा अंदाज घेऊन आधीच त्यावर उपाय शोधले तर आपण नक्कीच यशस्वी आणि म्हणून आनंदी होऊ हे नक्की!
कोणतेही कार्य हाती घेताना आपल्या मनात शंका-कुशंका येतातच. यावेळी जो ठाम निर्णय घेतो त्याच्यासाठी यशाचा दरवाजा उघडाच असतो. अपयश येईल किंवा नुकसान होईल या भीतीने एक पाऊल मागे सरकणाऱ्यांनी हा यशाचा दरवाजा कितीही जोर लावला तरी उघडत नाही.