अन्न व मानक प्राधिकरणाने मागवल्या प्रतिक्रिया
नवी दिल्ली : शाळांच्या कॅन्टीनमध्ये, तसेच शाळांपासून 50 मीटरच्या परिसरामध्ये जंकफूडच्या विक्रीवर आणि जाहिरातींवरही बंदी घालण्यात यावी, असा प्रस्ताव भारतीय अन्न व मानक प्राधिकरणाने केला आहे.
या प्रस्तावाचा मसुदा प्राधिकरणाने आज जाहीर केला आणि सर्व संबंधितांनी त्यावरील प्रतिक्रिया 30 दिवसांमध्ये मागवल्या आहेत. चरबी, मीठ आणि साखर जास्त असलेले खाद्यपदार्थ शालेय मुलांना कॅन्टीन, खानावळीच्या आवारात, वसतिगृहातील स्वयंपाकघरात किंवा शाळेच्या परिसरातील 50 मीटरच्या अंतरावर विकले जाऊ नयेत. खाद्यपदार्थांचे उत्पादन करणाऱ्या “फूड बिझिनेस ऑपरेटर’ंना शाळेच्या आवारात किंवा शाळेच्या परिसरातील 50 मीटरच्या आत अशा पदार्थांची जाहिरात करण्यास मनाई केली जाईल, असे या प्रस्तावामध्ये म्हटले आहे.
नियामकाने शाळेच्या आणि आसपासच्या आरोग्यासाठीच्या जाहिरातींवर बंदी आणण्याचा प्रस्ताव दिला आहे, असे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन कुमार अग्रवाल यांनी या वर्षी जूनमध्ये जाहीर केले होते. त्यानंतर शाळा प्रशासन किंवा करारबद्ध खाद्यान्न उत्पादकांना मानक प्राधिकरणाशी संपर्क साधून मध्यान्ह भोजनासाठी परवाना घ्यावा लागेल आणि अन्न सुरक्षा कायद्यानुसार आरोग्यविषयक तरतूदींचे पालन करावे लागेल.
सुरक्षित, निरोगी आणि आरोग्यदायी अन्न विद्यार्थ्यांना पुरवले जावे यासाठी आवारात नियमित तपासणी करण्यात यावी असेही या प्रस्तावाच्या मसुद्यात म्हटले आहे. विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी आणि पोषक आहाराचे सर्वसमावेशक आराखड्याची अंमलबजावणी शाळा प्रशासनाला करावी लागेल, असेही प्राधिकरणाने म्हटले आहे.