कामकाजाची घडी विस्कटल्यानंतर आता प्रभारी अधिकारी सरसावले
पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील (विद्या प्राधिकरण) कामकाजाची घडी विस्कटली आहे. आता या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी तीन प्रमुख प्रभारी अधिकाऱ्यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. “वेळेत या अन् वेळेतच सर्व कामे पूर्ण करा,’ अशा कडक शब्दांत समजही देण्यात आली आहे.
विद्या प्राधिकरणाची पुनर्रचना करण्याबाबत शासनाने आदेश काढले होते. मात्र, याची प्रत्यक्षात काहीच अंमलबजावणी झालेली नाही. मुख्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकूण 210 पदे निर्माण करण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात गेल्या काही वर्षांत केवळ 70 पदेच भरण्यात आलेली आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामे सोपवलेली आहेत.
शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे विद्या प्राधिकरण अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांच्याकडे सहसंचालक, तर शिक्षण आयुक्त कार्यालयातील अधीक्षक श्रीधर शिंत्रे यांच्याकडे प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. या प्रभारी अधिकाऱ्यांनी प्राधिकरणाच्या कारभारावर करडी नजर ठेवली आहे.
प्राधिकरणातील अधिकारी, कर्मचारी कधी येतात अन् कधी जातात, हेच लक्षात येत नाही. काही अधिकारी, कर्मचारी लन्च टाईमनंतर तर गायबच असतात. येथे हालचाल रजिस्टरही नाही. काही अधिकारी बैठकांच्या निमित्ताने सतत मुंबई, दिल्ली व इतर दौऱ्यांवर असतात.
यामुळे या सर्वच बाबींचा कामांवर विपरीत परिणाम होत असून “पेंन्डिंग’ कामे वाढत आहेत. ही माहिती देण्यासही टाळाटाळ करतात. कार्यालय आवारात बाहेरील नागरिकांची वाहने सर्रासपणे लावली जातात. वसतिगृहालाही काही शिस्त राहिलेली नाही. कार्यालयाच्या सुशोभिकरणाचे काम कासवगतीने आहे. यावरही अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचे उघडकीस आले आहे.
वेतनाएवढे तरी काम करा
विद्या प्राधिकरण आवाराची प्रभारी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. सकाळी 10 वा. या अधिकाऱ्यांनी अचानक हजेरी लावल्याने अजब कारभाराचे प्रकार समोर आले. या अधिकाऱ्यांनी या अधिकारी-कर्मचाऱ्यांची तासभर बैठकही घेतली. यात कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येकाने हालचाल रजिस्टरमध्ये नोंदी ठेवा, कामाच्या वेळापत्रकाचे पालन करा, जबाबदारीची जाणीव ठेवून शासनाकडून मिळत असलेल्या वेतनाएवढे तरी काम करावे, असा सल्ला प्रभारींकडून देण्यात आला आहे. यामुळे मक्तेदारी वाढलेले अधिकारी, कर्मचारी धास्तावले आहेत.