तेल कंपन्याकडून उत्पादनात वाढ सुरू
मुंबई : प्रदीर्घ काळाच्या लॉक डाऊन नंतर तर 20 एप्रिल पासून केंद्र सरकारने काही उद्योग अंशतः सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर लवकरच लवकरच लॉक डाऊन संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या बाबी ध्यानात घेऊन तेल कंपन्यांनी तेल शुद्धीकरण वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे.
इंडियन ऑईल कार्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी काही प्रकल्पातील काम अधिक वेगाने सुरू केले आहे. गेल्या एक महिन्यापासून इंधनाला मागणी नसल्यामुळे तेल कंपन्यांचे काम मंद गतीने चालू होते. आम्ही बऱ्याच प्रकल्पातील काम कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन सुरू केले आहे असे इंडियन ऑईल कार्पोरेशन ने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
यातील बहुतांश प्रकल्प ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगसाठी जास्त त्रास होणार नाही. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने ट्रक वाहतुकीसाठी परवानगी दिलेली आहे. त्याचबरोबर आगामी काळात इतर काही उद्योग सुरू करू देण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीचा तेल कंपन्या आढावा घेऊन कोणत्या वेळी किती तेल लागेल याचा अंदाज बांधून उत्पादनात वाढ करीत आहेत.
गेल्या एक महिन्यामध्ये स्वयंपाकाचा गॅस व वगळला तर इतर पेट्रोलियम पदार्थांच्या मागणीत फारशी वाढ झालेली नाही. आगामी काळात परिस्थिती सुधारली तर इंधनाचा तुटवडा जाणवू नये याची खबरदारी तेल कंपन्या घेत आहेत. इतर विकसित देशाच्या तुलनेत भारतीय भौगोलिक क्षेत्रात करोना व्हायरस जास्त परिणाम झालेला नाही. त्यामुळे यातून इतर देशांच्या तुलनेत भारत लवकर बाहेर पडू शकतो. जर स्वस्त इंधनाचा भारताने वापर केला तर भारताची अर्थव्यवस्था अधिक वेगाने पुढे जाऊ शकते. या शक्यता ध्यानात घेऊन तेल कंपन्या सावध आहेत.