- कृषी : आंदर मावळातील शेतकऱ्याची अनोखी किमया
टाकवे बुद्रुक – आंदर मावळातील डोंगर पठारावर हिवाळा संपला की पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते, अशा पाण्याच्या दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी अनुभवाच्या जोरावर डोंगरातून निचरा होणाऱ्या पाण्यावर गहू फुलवायची किमया डोंगरांमध्ये असलेल्या सटवाईवाडी येथील आदिवासी आजोबा विष्णु हेमाडे यांनी केली आहे.
गेल्या 10 वर्षांपेक्षा अधिक काळापासून पाण्याचा योग्य वापर करण्याची कला आजमावत हेमाडे यांनी उत्कृष्ट प्रतीचा गहू केला आहे. तो शेवटच्या टप्प्यात असून, काही दिवसातच तो काढण्यात येणार आहे. डोंगराळ भागात असलेले या परिसरात पावसाळ्यानंतर छोट्या प्रमाणावर झरे वाहतात. हे झरे ज्या ठिकाणाहून वाहतात त्या ठिकाणी मातीचा बांध घालून त्यातील पाणी शेताकडे वळवण्यात आले. शेतात पाणी आल्यानंतर पाईपच्या मदतीने संपूर्ण शेती ओलीताखाली आणून आजोबांनी गव्हाचे यशस्वी उत्पन्न घेतले आहे. येणाऱ्या उत्पन्नातूनच आपल्या कुटुंबाची उपजीविका करत असल्याचे हेमाडे यांनी सांगितले.
डोंगराळ भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असताना या पाण्याचे पिण्यासाठी संकलन करणे अवघड जात असताना या अल्प प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाण्याचे कुशलतेने व्यवस्थापन करून उपजीविका करणाऱ्या आजोबांना बळ द्यावे, अशी मागणी उपसरपंच संदीप गराडे यांनी मागणी केली.
या भागातील अनेक मुलांनी रोजगाराच्या शोधात डोंगर, डोंगरावरील वैभव व विपुल साधनसंपत्ती सोडून शहराची वाट धरली. याच डोंगरावर उन्नत पद्धतीने शेती करताना वापरण्यात येणाऱ्या विद्युत मोटारी, आधुनिक शेततळे, रासायनिक खते या सर्वांपासून अलिप्त असलेल्या डोंगरावर उतारवयात आयुष्य वेगळ्याच पद्धतीने जगणाऱ्या आजोबांचे कौतुक होताना दिसत आहे.