सातारा -राज्य सरकारने सुरू केलेली “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम करोना संसर्ग रोखण्यात मोठी भूमिका बजावेल. या मोहिमेत जनतेचा सहभाग घेऊन ती लोकचळवळ करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
“माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या सातारा जिल्ह्यातील मोहिमेचा आढावा मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी दृकश्राव्याप्रणालीद्वारे घेतला. या बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये सहभागी झाले होते.
कोणतीही मोहीम यशस्वी होण्यासाठी त्यात जनतेचा मोठा सहभाग आवश्यक आहे. आपण जनजागृतीतून करोना संकटाचा प्रभावीपणे सामना करू शकतो. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि विशिष्ट अंतर पाळण्यावर भर दिला पाहिजे. यावर्षीचा गणेशोत्सव सर्वांनी शांतपणे साजरा केला. आता नवरात्रोत्सवही शांततेत साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, या मोहिमेस जिल्ह्यातील जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात कोविड रुग्णालय उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रुग्णालयाला आणखी निधी उपलब्ध करावा. ग्रामपंचायत स्तरावर करोनाबाधित रुग्ण आढळल्यास त्याला तात्काळ गावातच तात्पुरता उपचार मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी छोटी रुग्णालये सुरू केल्यास रुग्णांची भीती कमी होईल. या मोहिमेत जिल्ह्याच्या 16 टक्के भागाची तपासणी करण्यात आली आहे. यापुढे ही मोहीम अधिक गतीने राबविण्यात येईल.