योगेश मिश्र
आजकाल सोशल मीडियावर बरेच उपदेशक पाहायला मिळतात. कोणी मोटिव्हेशनल स्पीकर, कोणी संत-महंत, कोणी शिक्षक तर कोणी अन्य विषयतज्ज्ञ. त्याबाबत…
कोणत्याही दिवशी सोशल मीडियावर नजर टाकली तर समाज किती सुधारला आहे हे लक्षात येते. मग तुम्ही स्वतःला बिघडलेले समजू लागाल. एकटे पडाल. या सर्व प्रकारचे उपदेशक उत्तम जीवनाचे अनेक गुण सांगताना दिसतात. तुम्हाला आनंदी जीवनाचे धडे दिले जातात. परंतु या सर्व प्रयत्नांचा उद्देश केवळ त्यांचे लाइक्स, कमेन्ट्स, ट्विट, रिट्विट्स आणि फॉलोअर्स वाढवणे एवढाच असतो. ते किती महान, किती ज्ञानी आहेत, असे तुम्हाला वाटेल. कारण त्यांचे इतके फॅन फॉलोइंग असताना हे असे का करतील, असा प्रश्न पडेल; परंतु वास्तव असे आहे की, अशा व्यक्तिमत्त्वांना असे करण्याची गरजच भासता कामा नये.
परंतु सर्वप्रथम त्यांचे वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करा. ते आपल्याला सांगतात, मायेपासून दूर राहा, पण त्यांच्याच भोवती मायेचा एवढा गराडा असतो की, ते पाहूनच तुमच्या मेंदूचा भुगा होईल. तुम्ही म्हणाल- बाप रे बाप! कांचन, काया आणि माया यांचा इतका अप्रतिम संगम तुम्ही क्वचितच पाहिला असेल. याचे कारण इतकेच की, आपण अत्यंत अज्ञात आणि नवीन निकष असणाऱ्या युगात प्रवेश केलेला असतो. म्हणूनच आपण जेव्हा कोणाशी तरी स्वतःला जोडून घेतो त्याच वेळी आपण त्याच्याकडून आपला किती फायदा होऊ शकतो, हे पाहतो; परंतु कोण आपले किती नुकसान करू शकते, हा प्रश्न आपण
स्वतःला विचारतच नाही. वस्तुतः तो विचारलाच पाहिजे; पण आपण तसे करत नाही. महादेवी वर्मा यांनी म्हटले आहे, स्वार्थमय सबको बनाया है करतारने. आपल्या समाजाच्या नवउदारमतवादी बाजाराचा अंतरंग स्वार्थी आहे. बाजारातून मिळालेल्या वस्तूंचा आपण उपभोग घेत आहोत आणि हाच स्वार्थ आपला गळा घोटत आहे, असे आपल्याला वाटत असते. परंतु घडत असते नेमके याच्या उलट. कारण स्वार्थाची पातळी झाडापासून केवळ फळे घेण्याइतकी मर्यादित राहिलेली नाही. आता तर वृक्ष तोडल्यानंतर त्यापासून मिळणारे लाकूड हडपण्यापर्यंत आणि रिकामी झालेली जमीन हडपण्यापर्यंत स्वार्थाने पातळी ओलांडली आहे. क्षणभंगुर असणाऱ्या या आयुष्यासाठी पूर्वी फक्त दोनच नियम होते- फुलासारखे उमलणे आणि सुगंधासारखे विखुरणे; परंतु आता अशी मानसिकता बनली आहे की, जर आयुष्य फक्त एका क्षणाचेच आहे तर ओरबडा… हल्लेखोरासारखे घुसून हडपून टाका. या एकाच नियमावर सध्या काम सुरू आहे. पाश्चात्य देश प्रगत आहेत आणि आपलाही समाज विकसित होत आहे, तो केवळ याच नियमानुसार..!
समाजात अर्थाचे अनेक स्तर तयार झाले आहेत. आम्हाला संसाधने मिळवायची असून, त्यायोगे समाधानी व्हायचे आहे. आपण जीवनात आनंदाला स्थान देणे बंद केले आहे. आपण जीवनात जागा आणि जमीन केवळ सुखाला दिली आहे. सुखाचा थेट संबंध भौतिकवादाशी आहे हे आपण विसरलो आहोत. एसी खरेदी करा, उन्हाळ्यात थंडीचा आनंद घ्या इ. परंतु आनंदाचा संबंध भावनेशी असतो. एसी शरीराला गारवा देईल; पण मनाला गारवा कुठे आणि कसा मिळणार?
कोणीतरी साहित्य विकून तुंबड्या भरत आहे, कोणी कार रॅलीत सहभागी होण्यासाठी फी मागत आहे, कोणी इतर सर्व जुगाड करून आपली आर्थिक स्थिती भक्कम करत आहे, असे दिसते. परंतु ते मात्र आपल्याला वेगळेच शिक्षण देत आहेत. ते म्हणतात, मायेपासून दूर राहा. कोणाच्या घरी सायंकाळच्या वेळी चूल पेटत नाही, कोणाची तब्येत बिघडली आहे, शाळेची फी न भरल्याने कोणाच्या तरी मुलाचे नाव शाळेतून काढले आहे, कोणाचे आईवडील त्याला अनाथ करून गेले आहे, कोणाकडे दवाखान्यात जाण्यासाठीही पैसे नाहीत… अशा असंख्य समस्यांच्या चक्रव्यूहात जो अडकला आहे, त्याने कसा विचार करावा? देशातील लोकसंख्येचा मोठा भाग अशा सर्व समस्यांशी झुंजत आहे; परंतु हे उपदेशक लोक मात्र ज्ञान शिकवण्याच्या व्यवसायातून बाहेर पडायला तयार नाहीत.
हे उपदेशक कसा उपदेश करतात? हे तुम्हाला नेहमी असे सांगताना दिसतील की, मनुष्य त्याच्या कमाईनुसार नव्हे तर त्याच्या गरजेनुसार गरीब असतो. आयुष्य खूप नकारात्मक परिस्थितीतून जात असेल तरीही तुम्ही सकारात्मकच विचार करायचा आहे. ते कसं शक्य आहे? डॉक्टरांना विचारा, मानसशास्त्रज्ञांना विचारा, समाजशास्त्रज्ञांना विचारा, ते म्हणतील, नाही… अजिबात नाही. पण हे नवे उपदेशक जोरजोरात म्हणतील, होय! तुमच्या शरीराचा सर्वांत सुंदर हिस्सा तुमचा चेहरा असतो. का? तर तुम्ही तोंडाची सर्वांत जास्त काळजी घेता. एखादी दुखापत केवळ औषध घेतल्याने बरी होत नाही. त्यापेक्षा तुम्ही त्याकडे लक्ष दिले, तर ती बरी होते. तुम्ही विचारही करत नसाल तर सावरणार कसे? हे उपदेशक असे म्हणतात, संकल्पामुळे सृष्टी निर्माण होते; परंतु सत्य असे आहे की, संकल्पाच्या खूप आधी सृष्टी निर्माण झाली आहे. सृष्टीनंतरच मनुष्य किंवा प्राणी येतात.
तुम्ही फक्त ग्राहक आहात असे समजणाऱ्या या मोटिव्हेशनल स्पीकर्सपासून स्वतःला दूर ठेवा. जसे व्हॉट्सऍप आणि फेसबुकवर येणारे असंख्य प्रेरक कोट्स तुम्ही डिलीट करून टाकता तसेच त्यांचे हवेतले शब्दही डिलीट करून टाका.