- महावितरणच्या कारभाराने नागरिक संतप्त
पिंपरी – लॉकडाऊन आणि अनलॉकच्या काळात महावितरणकडून येणारी भरमसाठ वीज बिले नागरिकांसाठी मनस्तापाचे कारण बनली आहेत. बंद असलेल्या घरांना आणि कार्यालयांना देखील हजारोंची वीज बिले पाठविली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत.
चार महिन्यांपासून बंद असलेल्या दोन कार्यालयांना महावितरणने हजारो रुपयांचे बिल पाठविले आहे. महावितरणच्या या कारभारामुळे सरासरी पाठविलेल्या बिलाचा दावा फोल ठरला आहे. तर हे वीजबिल भरण्यास सांगून महावितरणने वीज ग्राहकाला “शॉक’ दिला आहे.
लॉकडाऊनच्या काळात महवितरणने सरासरी वीज बिल पाठविले. या काळात अनेक जण गावी गेल्याने बंद घरांनादेखील वीज बिल देण्यात आले. तसेच हे बिल सरासरी असून, वीजग्राहकांनी ते भरावे, असे आवाहनही महावितरण प्रशासनाने केले होते. मात्र, यावर जनसामान्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर भरलेले वाढीव वीज बिल पुढील वीजबिलातून कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापी ग्राहकांच्या माथी वाढीव वीज बिले मारण्याचे प्रकार सुरुच आहेत. ही वीज बिले दुरुस्त करुन घेण्याकरिता ग्राहकांची महावितरण कार्यालयात मोठी रांग लागत आहे.
पाठविले 84 हजारांचे बिल
भाजप वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांचा प्रवासी वाहतूक करणारी वाहने भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय आहे. आकुर्डीतील जय गणेश व्हिजन येथील कार्यालयाला 84 हजार रुपयांचे वीज बिल पाठविले आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात 22 मार्चपासून हे कार्यालय बंद आहे. तर थेरगाव येथील खासगी कार्यालयाला 47 हजार 150 रुपयांचे वीजबिल पाठविले आहे.
लॉकडाऊनकाळात घरे, कार्यालये बंद असतानादेखील महावितरणने हजारो रुपयांची वीजबीले पाठविली आहेत. लॉकडाऊनमुळे नागरिक त्रस्त असताना महावितरणकडून होत असलेल्या या मानसिक त्रासामुळे ग्राहक वैतागले आहेत. याविरोधात लवकरच मोर्चा काढणार आहे.
दीपक मोढवे
अध्यक्ष, भाजप वाहतूक आघाडी
पिंपरी-चिंचवड शहर