कॅमेऱ्यात कैद झाल्याचे निष्पन्न : नागरिक दहशतीखाली
टाकळी हाजी- जांबुत (ता. शिरुर) येथे हल्ला करून एका दोन वर्षाच्या मुलीला ठार मारलेला नरभक्षक बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाने तब्बल आठ पिंजरे लाऊनही बिबट्या वनविभागाला चकवा देत मोकाट फिरत आहे. बिबट्याच्या वावर वाढल्यामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. मात्र, तो वनविभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाला. परंतु पिंजऱ्यात कैद होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसत आहे. जांबुत (जोरीलवन) येथे हल्ला करून चिमुकलीला ठार मारल्यानंतर आजपर्यंत त्या परिसराबरोबर अन्य गावांमध्येही घबराटीचे वातावरण पसरले आहे. लहान मुलांना सायकलवरून ये-जा करावी लागत असल्याने तसेच रस्त्याने व परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने रोजच नागरिकांना बिबट्याच्या दहशतीखाली वावरावे लागत आहे.
वनविभागाचे बिबट्या पकडण्यासाठी रोज नवनवीन प्रयोग पहायला मिळतात. मात्र, बिबट्या काही करून पिंजऱ्यात अडकत नसल्याने वनविभाग नरभक्षक बिबट्या पकडण्यासाठी अपयशी ठरत आहे. बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाने अजूनही पिंजरे लावण्याची गरज आहे. बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरचे हल्ले अजूनही सुरूच आहेत. बिबट्या नागरीकांना दिवसाही दर्शन देत आहे. त्यामुळे लवकर बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाने प्रयत्न करावे; अन्यथा गावबंद ठेऊन आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.